पुणे : राज्यात कृषी विभागाच्यावतीने खरीप हंगामासाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल या पीक स्पर्धेत शेतकऱ्यांना ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत सहभागी होता येणार आहे.
तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तर स्पर्धा घेण्यात येणार आहे. सर्वसाधारण व आदिवासी गटातील विजेत्या गटाला तालुकापातळीवर प्रथम ५ हजार, द्वितीय ३ हजार व तृतीय २ हजार आहे. जिल्हापातळीवर प्रथम १० हजार, द्वितीय ७ हजार व तृतीय ५ हजार आहे. विभागीयपातळीवर प्रथम २५ हजार, द्वितीय २० हजार व तृतीय १५ हजार आहे. राज्यपातळीवर प्रथम ५० हजार, द्वितीय ४० हजार व तृतीय ३० हजार रुपयांची परितोषिके आहेत.
तालुक्यामध्ये १ हजार हेक्टरहून अधिक लागवड क्षेत्र असलेल्या सर्व पिकांकरिता ही स्पर्धा आहे. पीक स्पर्धेसाठी तालुका पातळीवर सर्वसाधारण गटातील किमान १० स्पर्धक तर आदिवासी गटातील किमान ५ स्पर्धकांचा सहभाग आवश्यक असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३०० रुपये प्रति शेतकरी प्रति पीक या प्रमाणे प्रवेश शुल्क आहे.
एक शेतकऱ्याला एकापेक्षा अधिक पिकांसाठी स्पर्धेत भाग घेता येणार आहे. पूर्वी जिल्हा व राज्य पातळीवर वेगवेगळे शुल्क भरुन पीकस्पर्धेत भाग घ्यावा लागत होता. आता मात्र तालुका पातळीवर एकदाच प्रवेश शुल्क भरावे लागणार आहे. पीक कापणी वरून आलेल्या उत्पादकतेच्या निकालानुसार पीक स्पर्धेतील विजेत्यांची तालुका पातळीवर निवड केली जाणार असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुभाष काटकर यांनी दिली आहे.