सातारा (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीत भाजप कितीही भ्रम निर्माण करत असेल, तरीसुद्धा महाविकास आघाडी राज्यातील ३५ ते ४० जागा जिंकल्याशिवाय राहणार नाही. भाजपचा ४०० पारचा नारा केवळ कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी असून प्रत्यक्षात देशात भाजप दीडशे जागांच्या वर जाऊ शकणार नाही, असं ठाम विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी आमदार बाबुराव माने यांनी येथे व्यक्त केला.
सातारा येथे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना बाबुराव माने यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. केंद्रातील भाजप सरकार काॅर्पोरेट राजकारण करत असून त्यांचे सर्वसामान्यांच्या व्यथा, वेदनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे. उद्योगपतींच्या दुःखाकडे राज्यकर्ते अधिक लक्ष देत असून त्यांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ करत आहेत.
मात्र सामान्य शेतकरी, गरीब व्यावसायिक यांना कर्ज वसुलीसाठी वारंवार नोटिसा दिल्या जात आहेत. त्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. फार मोठे काही घडणार अशा प्रकारचा भ्रम मागील दहा वर्षात निर्माण केला गेला होता. सर्वसामान्य माणूस या निवडणुकीत तो याचे उट्टे काढल्याशिवाय राहणार नाही. आता मोठ्या सभांना भुलून लोकांचे मतदान होणार नाही असा विश्वासदेखील माने यांनी व्यक्त केला.
आजपर्यंत पंतप्रधान मोदी जे बोलले आहेत, त्याप्रमाणे काही घडलेले नाही. मग ते काही भावनिक मुद्दा पुढे करतात. हिंदू-मुसलमान करत बसतात. सर्वसामान्य हिंदूंना धर्माची नशा चढवायची आणि त्या नशेतून हिंदू मते बाजूला काढण्याचा प्रयत्न करायचा. त्यातून देशात मोठ्या प्रमाणात फूट पडली, समाजा-समाजात भांडणे लागली, माणसे मेली तरी यांना कशाची पर्वा नाही. मतांसाठी समाजात भांडणे लावण्याचे, दंगे पेटवण्याचे काम होताना दिसत आहे, अशी उद्विग्न भावना त्यांनी व्यक्त केली.
या निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाजूने लोकांच्यामध्ये प्रचंड सहानुभूती आहे असे छगन भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितले. पण एवढे स्पष्ट का बोललात म्हणून परवा छगन भुजबळ यांना महायुतीच्या लोकांनी दम दिला. यावरून राजकीय हवा कुठल्या बाजूने वाहते आहे हे स्पष्ट झाले आहे, असे त्यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे व अजित पवार यांची एकही जागा निवडून येणार नाही. विधानसभा निवडणुकीवेळी तर भाजप या दोघांची अवस्था मांजर ज्याप्रमाणे उंदराला खेळवते तशी केल्याशिवाय राहणार नाही.
अजित पवारांकडे नेतृत्व करण्याची क्षमता नाही. तशीच अवस्था शिंदे यांची आहे. जे लोक विश्वासाने त्यांच्यासोबत गेले त्यांच्या जागा हे टिकवू शकले नाहीत, तर विधानसभेला काय अवस्था होईल ते बघा असा खणखणीत टोला बाबुराव माने यांनी लगावला.