सातारा (प्रतिनिधी) – महाविकास आघाडी प्रवाहाविरोधातील आघाडी आहे . त्यासोबत जाणारे नेते आणि कार्यकर्ते गटांगळ्या खात आहेत. अशा गटांगळ्या खाणाऱ्यांची आपल्याला सोबत नकोच, असा घणाघात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला. सातारा शहरातून उदयनराजेंना मोठे मताधिक्य देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
शहरातील गोडोलीतील भैरवनाथ पटांगणात आयोजित कोपरा सभेत ते बोलत होते. याप्रसंगी खासदार उदयनराजे भोसले, माजी नगरसेवक ॲड. डी. जी. बनकर, शेखर मोरे पाटील, सुनील मोरे, विजय नाफड, ॲड. बाळासाहेब बाबर, शिरीष चिटणीस, सुनीता फरांदे, अविनाश कदम, अमोल मोहिते, जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे संचालक व्यंकटराव मोरे,
पंचायत समिती सदस्य आशुतोष माजी चव्हाण, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारणी सदस्या सुवर्णाताई पाटील, अजिंक्यतारा सूतगिरणीचे चेअरमन उत्तमराव नावडकर, संभाजीनगरचे सरपंच सतीश माने, राजू पिसाळ, सागर भोसले, सचिन तिरोडकर, फिरोज पठाण, अशोक मोरे यांची उपस्थिती होती.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, खासदार उदयनराजेंच्या विरोधात उभे असलेल्या उमेदवाराकडे जिल्ह्याचे अनेक वर्ष पालकमंत्री पद होते. त्यांनी त्या काळात एकही ठोस काम केले नाही. साताऱ्यासाठी त्यांनी काय दिलं, हे त्यांना आता विचारायला हवं. याउलट महायुती सरकारने साधारण शहरासह हद्दवाढीतील जनतेसाठी कोट्यवधीची कामे मंजूर केली आहेत, असे त्यांनी सांगितले.
शेखर मोरे पाटील म्हणाले, शहराच्या हद्दवाढ भागाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम दोन्ही राजांनी केले आहे. सुमारे 32 कोटींची पाणी योजना मंजूर केली. छत्रपती संभाजी क्रीडा संकुलासाठी मंजुरी मिळालेली आहे. व्यंकटराव मोरे म्हणाले, भाजप सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले. आपले स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी संसदेत प्रतिनिधित्व करणे गरजेचे आहे.
साताऱ्यात 599 कोटी रुपयांची कामे आणण्याचे काम खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी करून दाखवले आहे, असे अविनाश कदम यांनी सांगितले.