पुणे – शहरात यंदा गेल्या काही वर्षांपेक्षा जास्त खड्डे पडल्याचे जाणवत आणि दिसत आहे. या स्थितीला बेसुमार रस्तेखोदाई जबाबदार आहेच, पण रिसर्फेसिंग करण्यात आलेल्या अनेक रस्त्यांवर डांबरमिश्रीत खडीचे तापमान तपासले जात नसल्याचेही समोर आले आहे.
इंडियन रोड कॉंग्रेसच्या (आयआरसी)निकषानुसार हे रिसर्फेसिंग होते की नाही, याची कोणतीही तपासणी महापालिका अथवा रस्ते विकसित करणाऱ्या ठेकेदारांकडून केली जात नाही. त्यामुळे हे रस्ते उखडून त्यावर खड्डे पडत असून अवघ्या काही दिवसांतच या दुरुस्तीच्या कामाची वाताहत होत आहे. त्यामुळे प्रत्येक रस्त्याच्या कामासह खड्डे दुरुस्तीसाठी पालिकेने ही तपासणी बंधनकारक करावी, अशी मागणी केली जात आहे.
डांबरी रस्ता तयार करताना किती डांबर व खडी मिक्स करावी, याचे प्रमाण निश्चित असते. त्यानंतर हे मिक्स करण्यात आलेला हॉटमिक्स प्रत्यक्ष जागेवर घेऊन गेल्यानंतर त्याचे तापमान किती असावे? ते रस्त्यावर टाकल्यानंतर त्याचे तापमान किती असावे? तसेच प्रत्यक्ष त्यावर रोलर फिरविताना किती तापमान असावे? याचे निकष आहेत.
रस्ते विकसित करताना ठेकेदारांकडून या तापमानाच्या नोंदी केवळ कागदावर दाखविल्या जातात, तर प्रत्यक्षात खड्डे दुरूस्त करताना एका ट्रकमध्ये हॉटमिक्स आणून ते टप्प्या टप्प्याने खड्डयावर टाकतात आणि नंतर रस्त्यावर असलेले बिगारी हे हॉटमिक्स पसरून नंतर त्यावर रोलर फिरवितात.
मात्र, तोपर्यंत या हॉटमिक्सचे तापमान घटून निकषाच्या कितीतरी खाली आलेले असते. परिणामी, अवघ्या काही दिवसांत ही खडी डांबरातून बाजूला पडून रस्ते उघडण्यास सुरूवात होते. त्याचा त्रास पुणेकरांना होतो.
असे आहेत “आयआरसी’चे निकष
डांबराच्या प्रकारानुसार “आयआरसी’ने डांबरीकरण करताना हॉटमिक्स किती गरम असावे, याचे निकष दिले आहेत. त्यात खडी आणि डांबर एकत्र करताना त्याचे तापमान 120 ते 135 अंश सेल्सियस असावे. ते रस्त्यावर टाकल्यावर त्याचे तापमान 115 ते 120 अंश असावे. तर त्यावर रोलर फिरविताना ते सरासरी 80 ते 100 अंश सेल्सियस गरम असावे, असे नमूद केले आहे. मात्र, प्रत्यक्षात हे तापमान केवळ मिक्स करतानाच निकषाएवढे असते. त्यानंतर हॉटमिक्स घेऊन आलेल्या गाड्या शहरभर फिरतात. त्यामुळे या गाड्या दूरवर गेल्यास अथवा जास्त वेळ एकाच जागी थांबल्यास हॉटमिक्स निकषापेक्षा कितीतरी थंड होते.
हॉटमिक्सचे तापमान ठेवले न गेल्यास रस्ता दुरुस्ती योग्य पद्धतीने होत नाही. परिणामी, रस्ते व खड्डे दुरुस्तीनंतर लगेच खड्डे पडतात. त्यामुळे पैसा तर वायफळ जातोच. पण, नागरिकांचीही गैरसोय होते. ही बाब लक्षात घेऊन तातडीने यासाठीची तपासणी यंत्रणा उभारली जावी.
– विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच