प्रशांत जाधव
सातारा –राज्यातील सत्तांतरानंतर अनेक आमदारांना मंत्रिपदाचे वेध लागल्याचे चित्र आहे. त्यातच प्रत्येक आमदाराने आपल्याला मंत्रिपद मिळावे यासाठी आपापल्या राजकीय “गॉड फादर’कडे वशिला लावला आहे. जिल्ह्यातून भाजपची मुलुखमैदानी तोफ असलेले माणचे आमदार जयकुमार गोरे यांचे नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाची मोठी तयारी आतापासूनच केली आहे.
मात्र, भाजापमधील खास सुत्रांच्या माहितीनुसार आ. गोरे यांच्या मंत्रिपदाला मायणी येथील जमीन प्रकरणी दाखल गुन्ह्याचा अडसर ठरत असल्याची माहिती आहे. किमान या गुन्ह्यात जामीन करून घेण्याबाबत त्यांना पक्षश्रेष्ठींनी सूचना केल्याची माहिती भाजपाच्या एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. त्यामुळे दि. 13 रोजी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीवरच आ. गोरेंच्या मंत्रिपदाचा फैसला होण्याची चिन्हे असल्याने त्यादृष्टीने आ. गोरेंच्याकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
आ. गोरे हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जात असून यापूर्वी ते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे जवळचे मानले जात होते. मात्र, त्यांनी नंतरच्या काळात भाजपशी खासकरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सलगी वाढवली. तेव्हाच आ. गोरे भाजपात जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि त्यांनी 2019 मधील विधानसभा निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपमध्ये प्रवेश केला. आ. गोरे यांच्या भाजप प्रवेशाबाबत अनेक तर्कवितर्क लढवले गेले असले तरी मतदारसंघाच्या पाणी प्रश्नासाठीच आपण पक्ष बदलल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येते. 2019 मध्ये भाजप- शिवसेना युतीला बहुमत मिळाल्यानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी मंत्रिपदासाठी तयारी केली होती. यात साताऱ्यातील आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. जयकुमार गोरे यांच्याही नावाची चर्चा सुरू होती.
मात्र, महाविकास आघाडीचा प्रयोग अचानक समोर आला अन् महाराष्ट्रात नवीन समीकरणे उदयास आली. त्यामुळे या दोन प्रमुख दावेदारांची गोची झाल्याचे पाहयला मिळाले होते. परंतु, राज्यात पुन्हा एकदा “युती’ सरकार आल्याने जिल्ह्यातील या दोन दावेदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, आ. जयकुमार गोरे यांच्यावर मायणी येथील भिसे नावाच्या मृत व्यक्तीला तो जिवंत असल्याचे दाखवून त्याची जमीन त्यांच्या संस्थेला जाणाऱ्या रस्त्याला घेण्यासाठी दहिवडी तहसीलदारांसमोर खोटे प्रतिज्ञापत्र केल्याचा आरोप झाला आहे. याप्रकरणी आ. गोरे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर दहिवडी पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे.
त्यानंतर आ. गोरेंनी आधी जिल्हा व सत्र न्यायालयात मग उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला होता. या दोन्ही ठिकाणी त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने त्यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. दरम्यान, राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर सगळे आमदार आपल्यालाच मंत्रिपद मिळावे यासाठी मुंबईत असून ते “वशिला’ लावण्यात व्यस्त आहेत. मात्र, भाजपने विरोधी बाकावर असताना भ्रष्टाचार व गुन्हेगारी प्रवृत्तींशी संबंध असल्याचे आरोप करून महाविकास आघाडीला जेरीस आणले होते. नेमकी तीच परिस्थिती आत्ता सत्ताधारी भाजपला त्यांच्याबाबतीत नको असल्याने आ. गोरेंना भाजपच्या वरिष्ठ नेत्याने दाखल गुन्ह्याचा निपटारा करा किंवा जामीन घ्या, त्यानंतर मंत्रिपदाबाबत विचार करण्याचा सल्ला दिल्याचे भाजपच्या एका नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
फडणवीस कोणाचा शब्द पाळणार?
राज्यात 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांवेळी तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यात प्रचार सभा घेतल्या होत्या. सातारा मतदारसंघाच्या सभेवेळी त्यांनी आ.शिंवेंद्रसिंहराजे भोसले यांना मंत्री करणार असल्याची तर माणच्या सभेत “”तुम्ही गोरेंना आमदार करा मी मंत्री करतो” अशी जाहीर साद जनतेला घातली होती. त्यामुळे या सत्तास्थापनेत राज्यातला समतोल राखताना वाट्याला आलेल्या मंत्रिपदातून देवेंद्र फडणवीस नेमका कोणाला दिलेला शब्द पाळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.