मुंबई – राज्य सरकार पेट्रोल-डिझेलऐवजी दारू स्वस्त करत आहे. तसेच दारूबंदी संपवून दारुविक्रीला परवानगी दिली जात आहे. आता महाराष्ट्रात नवीन दारूविक्री परवाने देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि आता थेट सुपर मार्केट, किराणा दुकानातून घरोघरी दारू विक्री केली जाणार आहे. महाराष्ट्राला “मद्यराष्ट्र’ करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्यास परवानगी दिल्यामुळे राजकीय वाद पेटण्याची चिन्ह आहे. भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी वाईन विक्रीच्या निर्णयावर जोरदार आक्षेप घेतला आहे.
फडणवीस म्हणाले, शेतकरी-कष्टकरी, गरिब, बारा-बलुतेदार अशा एकाही घटकाला राज्य सरकारने गेल्या दोन वर्षांच्या करोना कालखंडात मदत केली नाही. सरकारचे प्राधान्य केवळ आणि केवळ दारूलाच दिले आहे. महाविकास आघाडीचे हे सरकार नेमके आहे तरी कुणाचे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच सत्तेच्या “नशे’त धुंद सरकारने गरिबांना थोडी तरी मदत करावी, असा टोलाही त्यांनी लगावला.