मुंबई : राज्यात दुकानांवरील मराठी पाटय़ा लावताना शोधल्या जाणाऱ्या पळवाटा रोखत मराठी पाट्या लावण्याचा सक्तीचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. दरम्यान महाराष्ट्रात दुकानांवरील मराठी पाट्यांचे श्रेय इतर कोणी लाटू नये. ते श्रेय फक्त मनसेचे व मनसे कार्यकर्त्यांचे अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडली आहे. तसेच राज ठाकरे यांनी आता कच खाऊ नका. याची अंमलबजावणी नीट करा असा सल्ला राज्य सरकारला दिला आहे. त्यांच्या या सल्ल्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे वक्तव्य आणि सल्ल्यासंबंधी संजय राऊत म्हणाले की, “कोणी काय सल्ला दिला यावर शिवसेना आपलं धोरण ठरवत नाही. बाळासाहेबांनी जेव्हा शिवसेना स्थापन केली तेव्हापासून आंदोलन सुरु आहे. आमची स्थानिय लोकाधिकार समिती, अन्य संघटना आजही या प्रकारचे काम करतात.
अनेक पक्ष आमच्या पक्षातून बाहेर गेले आहेत, पण जाताना तोच विचार घेऊन बाहेर गेले आहेत. कोण काय बोलतं यावर महाविकास आघाडी किंवा शिवसेनेचं धोरण ठरत नाही”. “मराठी हा शिवसेनेचा आत्मा आहे. मराठी अस्मिता राहणार, त्याच्याशी कधी तडजोड करणार नाही,” असे यावेळी संजय राऊतांनी सांगितले.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मराठी पाट्यांचा खर्च सरकारने द्यावा अशी मागणी केली आहे. यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “ते आम्ही पाहू. महाराष्ट्रात राहत आहात, येथील मातीचं खात आहात, श्वास घेत आहात याचे ऋण फेडण्याची वेळ असताना तुम्ही महाराष्ट्रासंदर्भात अशी वक्तव्यं करणं याला बेईमानी म्हणतात. मग तो खासदार, व्यापारी किंवा कोणीही असो”. “शिवसेनेचा जन्मच अस्मितेच्या मुद्द्यावर झाला आहे. अशा प्रकारची भाषा दक्षिणेत जाऊन करा,” असे आव्हानदेखील यावेळी त्यांनी दिले.