Chandrashekhar Bawankule | Sanjay Raut : ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी ‘सामना’मध्ये लिहिलेल्या रोखठोक या सदरात केंद्रीय राजकारणाबाबत काही मोठे दावे केले आहे. या लेखात भाजप पक्षातील अंतर्गत वादाबाबत सांगण्यात आले आहे. संजय राऊत यांनी नागपूरमध्ये नितीन गडकरी यांचा पराभव व्हावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिळून प्रयत्न केले, असा गंभीर दावा केला आहे.
यावरून राजकारण तापले आहे. त्यांनी या लेखात उत्तर प्रदेशमधील निकालांबाबतही राऊतांनी या लेखाच्या माध्यमातून भाकित वर्तवलं आहे. अमित शाह योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील, असं संजय राऊत म्हणाले आहेत. सामनामध्ये 4 जूननंतरची मोक्षप्राप्ती! या शीर्षकाखाली हा गंभीर दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, आता संजय राऊतांच्या या दाव्यांना भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच संजय राऊतांना चांगलाच सुनावलं देखील आहे.
उबाठाचे अधिकृत आणि शरद पवार गटाचे स्वयंघोषित प्रवक्ते संजय राऊत यांनी आज पुन्हा अकलेचे तारे तोडत भाजपच्या अंतर्गत राजकारणावर भाष्य केलं आहे. राऊत हे उद्धव ठाकरे यांचे कर्मचारी आहेत पण ते शरद पवार यांची चाकरी करतात. ते भ्रमिष्ट अवस्थेत ‘रोखठोक‘ लिहित असावेत. भाजप हा पक्ष नाही तर…
— Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) May 26, 2024
चंद्रशेखर बावनकुळेंच खोचक शब्दांत प्रत्युत्तर…
चंद्रशेखर बावनकुळे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, “उबाठाचे अधिकृत आणि शरद पवार गटाचे स्वयंघोषित प्रवक्ते संजय राऊत यांनी आज पुन्हा अकलेचे तारे तोडत भाजपच्या अंतर्गत राजकारणावर भाष्य केलं आहे. राऊत हे उद्धव ठाकरे यांचे कर्मचारी आहेत पण ते शरद पवार यांची चाकरी करतात. ते भ्रमिष्ट अवस्थेत ‘रोखठोक‘ लिहित असावेत.
भाजप हा पक्ष नाही तर परिवार आहे. ज्यांनी आयुष्यभर गटातटाचं राजकारण केलं त्या संजय राऊतांना परिवार काय कळणार आदरणीय मोदीजी, अमित भाई, योगीजी, नितीनजी, देवेंद्रजी हे भाजपच्या एकाच परिवारातील सदस्य आहेत. प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः हे मूल्य घेऊन भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता काम करतो.
पण संजय राऊतांच्या बाबतीत प्रथम शरद पवार नंतर स्वतः आणि शेवटी उद्धव ठाकरे आणि उबाठा गट असा क्रम आहे. त्यामुळे राऊतांच्या डोक्यातून असंच काहीतरी बाहेर पडणार. २०१९ मध्ये स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी संजय राऊतांनीही प्रयत्न केले होते. पण त्यांचा डाव यशस्वी झाला नाही. हिंमत असेल तर एक ‘ रोखठोक‘ त्यावरही येऊ द्या! असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
नेमकं काय आहे संजय राऊत यांचा सामना रोकठोक लेख –
“योगी को बचाना है, तो मोदी को जाना है”
उत्तर प्रदेशमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात योगी समर्थकांनी हाक दिल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. “अमित शहांच्या हाती पुन्हा सत्ता आली तर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील. त्यामुळे ‘योगी को बचाना है, तो मोदी को जाना है’ हा संदेश योगी समर्थकांनी फिरवला.
उत्तर प्रदेशात भाजपला ३० जागांचा फटका त्यामुळे सहज पडेल. आधी मोदी-शहांना घालवा असे उत्तरेतील योगी व त्यांच्या लोकांनी ठरवले. त्याचा परिणाम ४ जूनला दिसेल”, असं संजय राऊतांनी या लेखात नमूद केलं आहे.
एकनाथ शिंदेंनी प्रत्येक मतदारसंघात २५-३० कोटी वाटले”
दरम्यान, संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. “दिल्लीने महाराष्ट्रातील काही बेडूक फुगवले व त्यांना नेते बनवले. ते सर्व नेते राजकीय पटलावरून नष्ट होतील. एकनाथ शिंदे यांनी पैशांचा अफाट वापर या निवडणुकीत केला.
प्रत्येक मतदारसंघात त्यांनी किमान २५-३० कोटी रुपये वाटले. पुन्हा अनेक उमेदवार पाडण्यासाठी वेगळे बजेट. अजित पवार यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदे व त्यांच्या यंत्रणेने खास प्रयत्न केले”, असा गंभीर दावा संजय राऊतांनी केला आहे.