लखीमपूर – लखीमपूर खेरी शेतकरी हत्या प्रकरणात शेतकरी संघटना आणि विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशचं राजकारण तापलं आहे. काँग्रेसनेत्या प्रियंका गांधी लखीमपूर येथील घटनेपासून उत्तर प्रदेशात आहेत. त्यातच लखीमपूर खिरी येथे आज मृत शेतकऱ्यांना अंतिम प्रार्थनेचे आयोजन कऱण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमात प्रियंका यांना मंचावर जाण्यास शेतकरी संघटनेने मज्जाव केला होता.
लखीमपूर खिरी येथे आयोजित कऱण्यात आलेल्या प्रार्थनास्थळी प्रियंका गांधी दाखल झाल्या होत्या. टिकुनिया येथे हा कार्यक्रम होता. यावेळी प्रियंका गांधी यांच्यासह खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा, उत्तर प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू देखील होते. या राजकीय पुढाऱ्यांचे शेतकरी संघटनेने आभार मानले. मात्र राजकीय नेत्यांना मंचावर जाण्यास नकार देण्यात आला. यामुळे कार्यक्रमात दाखल झालेल्या प्रियंका गांधी जमिनीवर बसलेल्या दिसून आल्या.
दरम्यान शेतकरी संघटना 18 ऑक्टोबर रोजी ‘रेल रोको’ आंदोलन करणार असून 26 ऑक्टोबरला लखनौमध्ये महापंचायत घेणार आहे, अशी माहितीही योगेंद्र यादव यांनी दिली.
लखीमपूर खिरी येथे 3 ऑक्टोबर रोजी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्याचा आरोप आहे. या घटनेत चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता.