Lok Sabha Election 2024| देशात सध्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारी केली जात आहे. 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. त्यानंतर आता येत्या 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. एकीकडे काही भागातील मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही नेहरू-गांधी घराण्याचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीतून काँग्रेसने अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. मागील काही दिवसांपासून प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा यांच्या नावाची चर्चा येथून सुरू होती. लोकसभा निवडणुक लढण्याची देखील रॉबर्ट वड्रा यांनी इच्छा व्यक्त केली होती.
या दरम्यान, अमेठीतील काँग्रेस कार्यालयाबाहेर रॉबर्ट वाड्रा यांचे पोस्टर्स झळकल्याचे पाहायला मिळाले. अमेठीच्या गौरीगंज येथील काँग्रेस कार्यालयाबाहेर असलेल्या या पोस्टर्सवर ‘अमेठी की जनता करे पुकार, रॉबर्ट वाड्रा अब की बार,’ असे लिहिले आहे. सध्या या पोस्टर्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
काय म्हणाले होते रॉबर्ट वाड्रा ?
“केवळ अमेठीतूनच नाही, तर संपूर्ण देशातून मला मी सक्रिय राजकारणात यावे, अशी विनंती केली जात आहे. आम्ही तुमची मेहनत पाहिली आहे. तुम्ही गांधी घराण्याचे सदस्य आहात, ही तुमची जमेची बाजू आहे, असे लोक म्हणत आहेत. गांधी घराण्याने या देशासाठी किती केले, काय केले आणि करत राहतील हे त्यांनी पाहिले आहे. त्यामुळे या निवडणुकीवेळी मला अमेठीमधून निवडणूक लढवायची आहे. जर पक्षाने मलाअशी संधी दिली तर मी मोठ्या फरकाने निवडून येऊ शकतो,” असे प्रतिपादन रॉबर्ट वाड्रा यांनी केले होते.
#WATCH | Uttar Pradesh: Posters of Robert Vadra seen outside Congress’ office in Gauriganj, Amethi pic.twitter.com/UN7SB5pffG
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 24, 2024
“जर काँग्रेस पक्षाला वाटत असेल की मी सक्षम आहे किंवा लोकांना हवा असलेला बदल घडवून आणू शकतो आणि पाहू शकतो, तर काॅंग्रेसने मला उमेदवारी द्यावी, अशी माझी विनंती राहील, असे सांगून वड्रा म्हणाले की, अमेठीतून उभ्या असलेल्या भाजपाच्या स्मृती इराणी यांना विजय गृहित धरता येणार नाही. जरी आज भाजपा ४०० जागांचे ध्येय ठेवले असले तरी ते सहज शक्य नाही, हे पक्षाचे नेते जाणतात. त्यामुळे इंडिया आघाडीच्या सर्वच उमेदवारांना पुरेशी संधी आहे, असे मला वाटते,” असेही ते म्हणाले होते.
गेल्या निवडणुकीत राहुल गांधींचा अमेठीतून पराभव
गेल्या निवडणुकीप्रमाणेच राहुल गांधी यावेळीही केरळच्या वायनाडमधून निवडणूक लढवणार आहेत. मात्र, यावेळी ते अमेठीतून निवडणूक लढवणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 2019 च्या निवडणुकीत राहुल गांधींना अमेठीतून पराभवाला सामोरे जावे लागले होते. मोदी सरकारमधील मंत्री स्मृती इराणी यांच्याकडून निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. मात्र, वायनाडमधून निवडणूक जिंकून ते संसदेत पोहोचले. यूपीच्या लखनऊ, रायबरेली आणि अमेठी या जागांवर पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे.
हेही वाचा:
“माझ्या आईचं मंगळसूत्र देशासाठी शहीद झालंय” ; प्रियांका गांधींचे पंतप्रधानांना सडेतोड उत्तर