* अधिवेशनादरम्यान निघणार अंतिम अधिसूचना ?
हडपसर ( विवेकानंद काटमोरे )- महापालिकेच्या निवडणुका फेब्रुवारी २०२२ मध्ये अपेक्षित आहेत. त्यानुसार ऑगस्ट महिन्यापासून नवीन वॉर्ड किंवा प्रभाग रचना करण्यास प्रशासनाकडून सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उर्वरित २३ गावे येत्या आठवड्यात महापालिकेत समाविष्ट करण्याच्या हालचाली वेगाने सुरू असून अधिवेशनादरम्यान गावे महापालिकेत समाविष्ट करण्याची अंतिम अधिसूचना काढली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुणे महापालिकेत उर्वरित २३ गावे समाविष्ट करण्याचा सकारात्मक अहवाल विभागीय आयुक्तांनी नुकताच राज्य सरकारला दिला आहे. दरम्यान, महापालिकेनेही उर्वरित २३ गावे समाविष्ट करण्यासंदर्भात ‘ना हरकत’ असल्याचे पत्र राज्य सरकारला पाठविले आहे.
त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गावे समाविष्ट करण्याचा असेलला आवश्यक कालावधी लवकरच संपत असल्याचे गेल्या आठवड्यात मांजरी येथे सांगितले होते. त्यामुळे आठवड्याभरात गावे महापालिकेत समाविष्ट होण्याची अंतिम अधिसूचना निघण्याची
शक्यता वर्तवली जात आहे .
महापालिकेमध्ये नव्याने ३४ गावे समाविष्ट करण्यासंदर्भात गेली अनेक वर्षे चर्चा सुरू होती.दरम्यान ऑक्टोबर २०१७ मध्ये महापालिकेमध्ये ११ गावे समाविष्ट करण्यात आली .तर, उर्वरित २३ गावे टप्प्याटप्प्याने समाविष्ट करण्यासाठी तत्कालीन भाजप- सेना युती सरकारने तीन वर्षांची मुदत उच्च न्यायालयाकडे मागितली होती.
ही मुदत ऑक्टोंबर २०२० मध्ये संपली होती. मात्र, तीन वर्षांत त्यावर अंतिम निर्णय झाला नव्हता . परंतु राज्यातील सरकार बदलानंतर म्हणजे डिसेंबर २०२० मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा ही २३ गावे महापालिकेत समाविष्ट करण्यासंदर्भात तातडीने निर्णय घेतला. त्यानुसार नगरविकास विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला होता.
जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत सकारात्मक अहवाल राज्य सरकारला दिला होता. दरम्यान, नगर विकास विभागाने गावे समाविष्ट करण्यासंदर्भात मसुदा तयार केला. त्यावर तीस दिवसांत नागरिकांना हरकती व सूचना दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले होते. हरकती-सूचनांवर सुनावणी घेण्यासाठी विभागीय आयुक्तांची नेमणूक करण्यात आली होती. राज्य सरकारच्या या निर्णयावर जवळपास ८५० हरकती दाखल झाल्या होत्या.
मध्यंतरी विभागीय आयुक्तांनी सुनावणीची प्रक्रिया पूर्ण केली; परंतु कोरोनामुळे या संदर्भातील अहवाल आणि आपला अभिप्राय राज्य सरकारकडे पाठविला नव्हता. नुकताच हा अहवाल विभागीय आयुक्तांनी सरकारला पाठविला आहे.
राज्य सरकार त्यासाठीचा आवश्यक असलेला कालवधी देत असून तो पूर्ण होताच गावे महापालिकेत समाविष्ट करण्याची अंतिम अधिसूचना काढण्यात येईल ,असे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
निवडणुका पुढे ढकलल्या जाणार?
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण मुद्दा तसेच कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी २०२२ मध्ये होवू घातलेल्या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. असे झाल्यास गावे महापालिकेत समाविष्ट होण्याचा निर्णयही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
ही गावे होणार समाविष्ट
म्हाळुंगे, सूस, बावधन बुद्रुक, किरकटवाडी, पिसोळी, कोंढवे-धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बुद्रुक, नऱ्हे, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर-निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी, वाघोली.