विस्तार केल्यानंतर हवामान अंदाज आणखी अचूक
पुणे – राज्यात पावसाचा वेध घेणाऱ्या “रडार’ यंत्रणेचा विस्तार करण्यात येणार आहे. त्यानुसार हवामान विभागातर्फे राज्यातील रत्नागिरी, बोरिवली तसेच कर्नाटकात मंगळुरू येथे रडार बसवण्यात येणार आहे. तर, भारतीय उष्णकटिबंधीय हवामान संस्था अर्थात “आयआयटीएम’तर्फे कोकण आणि मुंबई येथे चार रडार बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे पावसाचा अचूक वेध घेण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे.
इंडियन मेटेरोलॉजिकल सोसायटी संस्थेतर्फे पत्रकारांसाठी आयोजित तीनदिवसीय कार्यशाळेत हवामान विभाग महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी “चक्रीवादळ अंदाज सेवेतील आधुनिक सुधारणा’ विषयावर आणि “आयआयटीएम’चे वरिष्ठ हवामान संशोधक के. एस. होसाळीकर यांनी यावर्षीच्या पावसाचा अंदाज आणि या क्षेत्रातील अद्ययावतता याविषयी माहिती दिली.
डॉ. महापात्रा म्हणाले, “देशाच्या पूर्व किनाऱ्यावर रडार यंत्रणा अतिशय सक्षमपणे विकसित आहे. येत्या काळात पश्चिम किनारपट्टीवरही रडार यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्या अनुषंगाने बोरिवली आणि मंगळुरू येथे यंत्रणा बसवण्यात येत आहे.
नागपूरमध्ये ही यंत्रणा आहे. तर, मराठवाड्यात अशी यंत्रणा विकसित करण्याबाबत विचार केला जाईल.’ डॉ. होसाळीकर म्हणाले, “आयआयटीएम संस्थेच्या माध्यमातून राज्यात चार रडार बसविण्यात येणार आहेत. त्यापैकी एक मुंबई येथे तर उर्वरित रडार हे उत्तर कोकण भागात बसविण्यात येणार आहे. या प्रत्येक रडारची व्यापकता ही 100 कि.मी. इतकी असेल’
पश्चिम किनारपट्टी भागात चक्रीवादळे वाढली, हा समज चुकीचा
हवामान बदलाच्या दुष्परिणामांमुळे पश्चिम किनारपट्टी भागात चक्रीवादळांची संख्या वाढल्याची बरीच चर्चा सुरू आहे. त्याबाबत अभ्यासही करण्यात आला. मात्र, त्यावर अभ्यासकांचे एकमत झालेले नाही.
याउलट या भागात चक्रीवादळांची संख्या वाढली नसून, त्याची तीव्रता वाढल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. त्यामुळे पश्चिम किनारपट्टी भागात चक्रीवादळांची संख्या वाढली, हा समज चुकीचा असल्याचे डॉ. महापात्रा म्हणाले.