कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. मात्र तरीही सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यातील वाद काही केल्या संपताना दिसत नाही. उलट, तो वाढतच चालल्याचे पाहायला मिळत आहे. कारण विधीमंडळ नेता आणि विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्याविरोधात पोलीस स्थानकांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांच्यावर मदत साहित्य चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे.
‘यास’ या चक्रिवादळाने पश्चिम बंगालच्या काही भागांना जोरदार तडाखा दिला. यानंतर मदतकार्य अद्याप सुरू असल्याचे सांगितले जात आहे. यातच पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील कोंटाई येथील पोलीस स्थानकांना भाजपचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी आणि त्यांचे बंधू सौमेंदू अधिकारी यांच्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. तृणमूल काँग्रेसने मदत साहित्य चोरल्याचा आरोप केला आहे.
कोंटाई नगरपालिकेत काम करणाऱ्या व्यवस्थापन मंडळातील सदस्य असलेल्या रत्नदीप मन्ना यांनी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी कारवाई करत प्राथमिक माहिती अहवाल दाखल करून घेतला आहे. यामध्ये २९ मे रोजी हिमांग्शू मन्ना आणि प्रताप डे नामक दोन व्यक्तींनी नगरपालिकेच्या गोदामातून ताडपत्रींचा एक ट्रक चोरून नेला आहे.
यामागे सुवेंदू अधिकारी आणि त्यांचे बंधू सौमेंदू अधिकारी असून, केंद्रीय सुरक्षा दलांची यासाठी मदत घेण्यात आली, असा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीच्या आधारे आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत सुवेंदू अधिकारी, सौमेंदू अधिकारी, हिमांग्शू मन्ना आणि प्रताप डे यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रताप डे याला अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
पश्चिम बंगालमधील निवडणुकांनंतर आता भारतीय जनता पक्षातील अंतर्गत कलह वाढण्याची चिन्हे असून, वाद चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली आहे. प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष हुगली येथील चुचुरा भागात बुथ लेवल कार्यकर्त्यांच्या बैठकीत सहभागी झाले होते. मात्र, या बैठकीत वाद झाला आणि कार्यकर्त्यांनी दिलीप घोष यांना घेराव घालत निदर्शने केली. हुगली जिल्हा समिती बरखास्त करावी आणि जिल्हाध्यक्ष गौतम चॅटर्जी यांना हटवण्यात यावे, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली होती.