गुन्ह्यांत घट झाल्याची अनिल देशमुख यांची माहिती
पुणे – गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील गुन्ह्यांच्या घटनेत घट झाल्याची खोटी माहिती विधीमंडळात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्याचा आरोप भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला. राज्यांत महिलांवरील अत्याचारांच्या घटनांत वाढ झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
पत्रकार परिषदेत वाघ म्हणाल्या की, “राज्य सरकार महिलांवर झालेल्या अत्याचाराची दखल घेत नाही. सगळीकडे जागतिक महिला दिन साजरा होत असताना महाबळेश्वर येथे चिमुकलीवर तिच्या शिक्षकाने बलात्कार केला. त्यापाठोपाठ नऊ मार्चला मुंबईत बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेणाऱ्या मुलीवर तिच्या ट्रेनरकडून अत्याचार झाला.
बीडमधील मुलीचे अपहरण होऊन महिना उलटला तरी आरोपीवर कारवाई केली नाही. तुळजापूर तालुक्यातील अणदूर गावात सामूहिक बलात्कार आरोपींची नावे सांगूनही मोकाट आहेत, अशी आरोपांची सरबत्ती त्यांनी केली.
सरकार महिलांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करत असून राज्यातील सामाजिक न्याय विभाग झोपी गेला आहे. राज्यात कुंपणच शेत खात असल्याची परिस्थितीत निर्माण झाली असल्याची टीकाही त्यांनी केली