नुकसानभरपाई देण्यास आयुक्तांचा नकार; चौकशी करण्याची विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांची मागणी
पिंपरी – पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या निगडीतील अस्तित्व मॉल येथील कार्यालयातील 27 सर्व्हरवर नुकताच सायबर हल्ला झाला. त्यानंतर सुमारे पाच कोटींचे नुकसान झाल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे. मात्र, ठेकेदाराचे झालेले नुकसान देण्यास महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी स्पष्ट नकार देत खंबीर भूमिका घेतली आहे. तर महापालिकेचे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केल्याने सायबर हल्ल्याचे गौडबंगाल अधिकच वाढले आहे.
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीचे निगडी येथे कंट्रोल आणि कमांड सेंटर आहे. या ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या डेटा सेंटरसाठी पालिकेने ठेकेदारावर तब्बल दीडशे कोटी रुपये खर्च केले आहेत. टेक महिंद्रा या कंपनीस स्मार्ट सिटीकडील अंदाजे 450 कोटींचे कामकाज देण्यात आलेले आहे. यापैकी 150 कोटी रुपये डेटा सेंटर तयार करण्यासाठी खर्च झाले आहेत. इतका खर्च करूनही सदर डेटा सेंटरमधील डेटा सुरक्षित नसल्याचेच स्पष्ट झाले आहे.
सायबर हल्ल्यात पाच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार ठेकेदार कंपनीने नोंदविली आहे. ही तक्रार तब्बल 11 दिवसांनी नोंदविल्यामुळे विरोधकांनी आक्षेप घेत ठेकेदार कंपनीची चौकशी करण्याची मागणी केली होती. तर सत्ताधारी भाजपाच्या पक्षनेत्यांनी ठेकेदाराची बाजू उचलून धरत नुकसान झाले नसल्याचे सांगितले होते. एकूणच या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापू लागल्यानंतर महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी ठेकेदाराला एकही रुपया भरपाई देणार नसल्याचे सांगितले आहे. आयुक्तांच्या या भूमिकेचे सर्वसामान्यांमधून स्वागत होत आहे.
स्मार्ट सिटीच्या कामांसाठी महापालिकेने आतापर्यंत शेकडो कोटी रुपये खर्च केले आहेत. सत्ताधाऱ्यांच्या सग्यासोयऱ्यांना कामे देण्यात आल्याने बहुतांश कामांचा दर्जा राहिलेला नसल्याचे यापूर्वीही उघड झाले आहे. असाच प्रकार डेटा सेंटरच्या बाबतीत झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी विरोधकांकडून होत आहे.
ठेकेदाराला एक पैसाही देणार नाही- आयुक्त
महापालिकेच्या स्मार्ट सिटीच्या निगडीतील कंमाड ऍण्ड सेंटरवर सायबर हल्ला प्रकरणात महापालिकेच्या कोणत्याही माहितीचे नुकसान झालेले नाही. संबंधित ठेकेदार कंपनीचे नुकसान झाले असून, त्यासाठी महापालिका ठेकेदार कंपनीला एक पैसाही देणार नाही, असे महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी शुक्रवारी (दि. 12) स्पष्ट केले. सायबर हल्ल्यात 5 कोटींचे नुकसान झाल्याचे ठेकेदार कंपनी टेक महिंद्राने पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यासंदर्भात महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
अधिकारी, ठेकेदारांवर कारवाई करा
स्मार्ट सिटीसाठी निर्माण करण्यात आलेल्या डेटा सेंटरसह इतर अनेक कामांमध्ये अनागोंदी असून या संपूर्ण प्रकरणाला जबाबदार असलेल्या ठेकेदार, सल्लागार व संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून नुकसानीची जबाबदारी संबंधितांवर निश्चित करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी शुक्रवारी (दि. 12) झालेल्या पत्रकार परिषदेत केली. ठेकेदाराने विहीत कालावधीत व योग्य प्रकारे कामकाज केलेले नसताही अंदाजे 70 टक्के पेक्षा जास्त कामाचे बिल संबंधितांना कसे अदा केले असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. कामकाजात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे.
सदरील वस्तू या मनपाच्या मालकीच्या आहेत. असे असतानादेखील सदरचा गुन्हा मनपामार्फत दाखल होणे गरजेचे होते, परंतु महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही जबाबदारी ठेकेदारावर ढकलल्याने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही मिसाळ यांनी केली आहे.