नवी दिल्ली : केंद्र सरकारने नवीन कामगार कायद्या लागू करण्यासाठी वेगाने हालचाली सुरु केल्या आहेत. यामध्ये सरकार जादा कामाची सध्याची मर्यादा बदलण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नवीन नियमांनुसार जर ठरलेल्या तासांपेक्षा 15 मिनिटांपेक्षा जास्त काम केलं तर ते ओव्हरटाइमच्या श्रेणीमध्ये मोजले जाणार आहे. एवढेच नाही तर यासाठी कंपनीला कर्मचार्यांना पैसे द्यावे लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
एका इंग्रजी वर्तमानपत्राने यासंबंधी वृत्त दिले आहे. आधी ठराविक शिफ्ट व्यतिरिक्त अर्धा तासांची मुभा होती. त्यानंतर ओव्हरटाईम मोजला जायचा. पण आता ही मर्यादा बदलून कंपनी 15 मिनिटं जास्त काम केल्यास त्याला ओव्हराटाईममध्ये मोजणार असल्याची माहिती समोर येत आहे. यावर अद्याप सरकार काम करत असून लवकरच यासंबंधी अधिकृत माहिती समोर येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
नवीन कामगार कायद्यांतर्गत येत्या काही दिवसांत कर्मचार्यांना आठवड्यातून तीन दिवस सुट्टी दिली जाण्याची शक्यता आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालय या आठवड्यात चार नवीन कामगार कायदे लागू करण्यासाठी त्यांच्याशी संबंधित नियमांना अंतिम रूप देऊ शकते. हे कायदे लागू करून देशाच्या कामगार क्षेत्रात सुधारित नियम आणि कायद्यांचे नवीन पर्व सुरू होणार आहे. आराखडा अंतिम झाल्यामुळे कर्मचार्यांना आठवड्यातून चार कामकाजाचे दिवस असतील आणि त्यासोबत तीन दिवस रजा मिळेल.
याशिवाय असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नोंदणी आणि कल्याणासाठी मंत्रालय इंटरनेट पोर्टल तयार करत आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हे पोर्टल जूनपर्यंत तयार होऊ शकेल. असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी नोंदणी आणि इतर सुविधा या पोर्टलवर देता येतील. यामध्ये कंत्राटी कामगार, प्लॅटफॉर्म कामगार यांसारख्या कामगारांची नोंदणी केली जाईल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या भाषणात अशा वेब पोर्टलच्या स्थापनेचा उल्लेख केला होता.