नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज लोकसभेत सरकारच्या धोरणं आणि निर्णयांवर कडक शब्दात टीका केली. तसेच शेतकरी आंदोलन आणि नवीन संसदेच्या निर्मितीवर मोदी सरकारचा समाचार घेतला. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनावर सन्मानजनक तोडगा काढण्याचे आवाहन सरकारला केले.
अमोल कोल्हे यांनी नव्या संसद भवनाच्या निर्माणावर आपले मत व्यक्त केले. देशाची सार्वजनिक आरोग्यव्यवस्था कमकुवत असल्याचे कोरोना महामारीने उघड केले. अशा वेळी देशाचे प्राधान्य प्रत्येक लोकसभा मतदारसंघ, जिल्ह्यात सुसज्ज असे सार्वजनिक रुग्णालय उभारण्याची असायला हवे. संसद भवनाची मागणी कुणीही केलेली नसताना त्याच्या निर्माणाचा अट्टहास का, असा सवालही कोल्हे यांनी केले.
महाराष्ट्र सरकारच्या हक्काची, जीएसटीच्या परताव्याची सुमारे २५ हजार कोटी रुपये केंद्राकडून येणे बाकी आहे. ही रक्कम तातडीने देण्यात यावी, अशी विनंती कोल्हे यांनी केली. यावेळी कोल्हे यांनी बेरोजगारीवरून सरकारला टोला लगावला. सरकारने देशातील दोन कोटी तरुणांना दरवर्षी रोजगार देण्याचे एक स्वप्न दाखविले होते.पण रोजगार मिळायचे लांबच राहिले जे हातात होतं ते देखील निसटून गेलं अशी स्थिती आहे. ‘नीम’ आणि ‘नॅशनल अप्राईंटिस’ यांसारखी धोरणे देशातील तरुणांसाठी शोषणव्यवस्था ठरल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान राष्ट्रपती महोदयांनी आपल्या अभिभाषणात चाणक्याची वचने उद्धृत केली आहेत.पण मी या सभागृहाला सांगू इच्छितो की याच आर्य चाणक्यांनी असंही म्हटलं आहे की, जेंव्हा राजाचा अहंकार प्रजेच्या हितापेक्षा मोठा होतो, तेंव्हा समजून जा की त्याच्या शासनकाळाचा अंत होणार हे निश्चित आहे, असा इशारा कोल्हे यांनी मोदी सरकारला दिला.