करंदी, (वार्ताहर) – तुम्हाला खासदार म्हणून निवडून दिलं, पण आमच्या गावासाठी तुम्ही काय केलं? तेवढं तुम्ही आम्हाला सांगावं, असा थेट सवाल करंदी ग्रामस्थाने डॉ. अमोल कोल्हे यांना केला.
करंदी येथे कोल्हे प्रचारदौर्यासाठी आले असताना, त्यांच्या भाषणात मध्येच ग्रामस्थांनी त्यांना प्रश्न केले; मात्र त्याला समर्पक उत्तर न देता कोल्हे यांनी पंतप्रधान ऩरेंद्र मोदी यांनी 10 वर्षांत पत्रकार परिषद घेतली का? असा प्रतिप्रश्न ग्रामस्थाला केला. त्यामुळे कोल्हे हे पाच वर्षांत मतदारसंघात फिरकले नसल्याच्या चर्चांना गावागावात उधाण आले असताना, आता गावासाठी तुम्ही काय केले? या ग्रामस्थांच्या प्रश्नांनी कोल्हे यांची प्रचारदौर्यात उत्तरे देताना भंबेरी उडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
यावर बोलताना आढळराव म्हणाले, कोल्हेंना करंदीतच काय तर गावोगावी हेच लोक अनेक प्रश्न विचारत आहेत. त्यांनी स्वत काय केले हे न सांगता, ते माझ्याच कार्यअहवालातील कामे आपण केल्याचा कांगावा करुन वेळ मारून नेत आहेत. पण जनतेला हे माहिती आहे 15 वर्षे मी जनतेत आहे. करंदीचेच उदाहरण घ्यायचे झाले तर करंदी गाव सांसद आदर्शग्राम योजनेत माझ्याकडे होते,
तेव्हा मी या गावासाठी कोट्यवधीचा निधी दिला. त्यातून अनेक कामे मार्गी लागली आहेत. मी केलेल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर आहे. त्यामुळे कधीतरी मतदार संघात उगवणार्यांनी मतदारांना भ्रमनिरास होणार नाही, अशी वक्तव्ये तरी करण्याचे टाळावे असा सल्ला आढळराव यांनी कोल्हेंना दिला आहे.
गावात तुमचे पाच वर्षे स्वागत, अशा प्रकारे खिल्ली उडवणारे फलक कोल्हेंबाबत लावले जात आहेत. तुम्ही गावासाठी पाच वर्षात काय केले, अशी विचारणा गावोगावी केली जात असेल तर कोल्हे यांनी स्वतः आत्मपरिक्षण करुन या प्रश्नांच्या उत्तरावर चिंतन करण्याची गरज आहे. -शिवाजीराव आढळराव पाटील, महायुतीचे उमेदवार शिरूर