नवी दिल्ली – देशभरामध्ये सध्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत शेतकरी आंदोलनाचा ( farmer protest ) विषय चर्चिला जात आहे. केंद्र सरकारने लागू केलेले कृषी कायदे रद्द करण्यात यावेत या प्रमुख मागणीसह शेतकरी गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर ठिय्या मांडून बसलेत.
दरम्यान, कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन सुरु झाल्यापासूनच सत्ताधारी भाजपच्या नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार ( sharad pawar ) यांच्या एका पत्राचा दाखला देण्यात येतोय. आज तर भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे ( jyotiraditya scinindia ) यांनी शरद पवारांचे ‘ते’ पत्र थेट राज्यसभेतच वाचून दाखवलं.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये सामील झालेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रदर्शन करत असताना शरद पवारांचे कृषी मंत्री असतानाचे पत्र वाचून दाखवले. शिंदे यांनी, ‘शरद पवार हे देशाचे कृषीमंत्री होते, तेव्हा 2010-2011 मध्ये त्यांनी देशातील प्रत्येक मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले होते. यात कृषी क्षेत्रात खासगी क्षेत्राची भागिदारी गरजेची असून यासाठी एपीएमसी कायद्याचे संशोधन झाले पाहिजे असं म्हटले होते.’ असं सांगितलं.
‘त्या पत्रात त्यांनी एपीएमसी कायद्याचा उल्लेख केला होता. पण आता ते आपल्याच विधानावरून मागे हटत आहेत. ही सवय आता बदलली पाहिजे, देशासोबत असा खेळ कुठपर्यंत चालणार?, तुम्ही जर तुमच्या निर्णयावर ठाम राहिले तर तुमचा सन्मान आणखी वाढेल,’ असा टोलाही ज्योतिरादित्य शिंदेंनी पवारांना लगावला.