कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा मधील विजय स्तंभाला आज सकाळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अभिवादन केले. त्यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. सरकारकडे अर्थव्यवस्था बदलण्यासाठी प्लॅन नाही, सरकार फक्त आदेश काढण्याचे काम करत आहे, अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
एक जानेवारी हा या देशातील सामाजिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचा दिवस आहे असे आम्ही मानतो, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. पेशवाईच्या काळात जी अस्पृश्यता पाळली जात होती त्या विरोधातील हा लढा होता. हा लढा यशस्वी झाला. तेव्हापासून सुरू झालेली ही सोशल मुव्हमेंट खऱ्या अर्थाने जोपर्यंत लोकशाही येत नाही तोपर्यंत कायम राहील, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारकडे अर्थव्यवस्था कशी सुधारायची याचा प्लॅन नाही. लोक ठरवतायत काय करायचं ते. सरकार स्वतः काहीही करत नाही. मुंबई लोकल आतापर्यंत सुरू व्हायला हवी होती. दोन्ही सरकारकडे निर्णयक्षमता नाही, असंही ते म्हणाले. यल्गार परिषदेबाबत बोलताना ते म्हणाले की, कोळसे पाटलांना यल्गार परिषद घ्यायची असेल तर त्यांनी घ्यावी. मला आणि न्यायमूर्ती पी.बी.सावंतांना जी घ्यायची होती ती आम्ही घेतली आणि त्याचा उद्देश देखील साध्य झाला, असे ते म्हणाले.
कोरेगाव भीमा लढाईत सैनिकांनी त्यावेळी जे शौर्य दाखवलं त्याचा आम्हाला आजही अभिमान आहे. कोरेगाव भीमा ठिकाणाचा विकास आराखडा मंजुर करा अशी मागणी आहे. कोरेगाव भीमा विकास आराखड्यासाठी कोणतीही अडचण येऊन देणार नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह गृहमंत्री अनिल देशमुख आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडून कोरेगाव भीमा मधील विजय स्तंभाला अभिवादन केले.