गेल्या आठवड्यात शरद पवारांचे नाव पुन्हा चर्चेत आले. तसे ते कायम चर्चेतच असतात. मात्र ही चर्चा दिल्लीच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी ठरली. त्याला कारण पवारांचे नाव संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षपदासाठी घेतले गेले. कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडी स्थापन झाली आहे. अंतरात्म्याचा आवाज ऐकून पंतप्रधान पद नाकारणाऱ्या सोनिया गांधी या आघाडीच्या अध्यक्षा राहिल्या आहेत.
कॉंग्रेस सगळ्यांत मोठा पक्ष असल्याने आणि त्या पक्षाची 2004 पासून सलग दहा वर्षे सत्ता राहिल्याने सोनियांच्या नावाला कोणाचा आक्षेप नव्हता. तथापि, प्रकृतीच्या कारणामुळे सोनियांनी हळूहळू जबाबदाऱ्या त्यांचे पुत्र राहुल यांच्याकडे सोपवण्यास सुरुवात केली. मात्र राहुल यांची अध्यक्षपदाची इनिंग फ्लॉप ठरली. त्याला कारण दिल्लीच्या आणि देशाच्या राजकारणात नरेंद्र मोदी यांचा झालेला उदय. मोदींच्या लाटेत अनेक पक्षांची वाताहत झाली. मात्र अनेक पक्ष आणि कॉंग्रेस यात फरक आहे. कॉंग्रेस सगळ्यांत जुना पक्ष आहे. सर्वसमावेशक राजकारण करणारा पक्ष आहे. नेहरू-गांधी घराण्याचे वलय असणारा पक्ष आहे. कितीही दयनीय अवस्था झाली तरी हा पक्ष आणि त्याची विचारधारा मानणारा एक वर्ग आजही प्रत्येक गावात आहे. त्यामुळे कॉंग्रेसचा पराभव मोठा.
पराभवाने खचायचे नसते असे म्हणतात. मात्र हा पक्ष खचला. संपला नसला तरी जुनी उभारी घेण्याच्या प्रयत्नातही दिसत नाही. राहुल यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. पुन्हा पद घेणार नसल्याचे जाहीर केले. एक दोन डमी उमेदवारांची नावे मध्यंतरी चालली. पुन्हा सोनियांनाच कमान हाती घ्यावी लागली. मात्र त्या पूर्वीसारखा वेळ देऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व करू शकत नाहीत ते यूपीएचे नेतृत्व कसे करणार, हा प्रश्न होता आणि आहे. त्यातून शरद पवार यांचे नाव अचानक पुढे केले गेले. पवार एक समर्थ नेते आहेत. अन्य कोणा नेत्याचे नाव घेतले गेले असते तर कदाचित चर्चाही झाली नसती. ती पवारांच्या नावामुळे झाली. पवारांनी खुद्द तसे काही नसल्याचे म्हटले. त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यानेही याचा इन्कार केला. इतकेच काय परवापर्यंत पवारांसोबत असलेले व पुन्हा स्वगृही म्हणजे कॉंग्रेसमध्ये परतलेले तारीक अन्वर यांनीही असे काही असल्याचा इन्कार केला. या ज्या बातम्या फिरत आहेत, त्याची पवारांना कल्पनाही नसणार असे अन्वर यांचे म्हणणे. त्यांना काय वाटते ते येथे गैरलागू. मात्र राजकारणात काहीतरी असल्याशिवाय काहीतरी पुढे येत नाही.
पवारांचेच नाव येण्यामागे एक व्यवस्थित आखलेली रणनीती असू शकते असे मानायला वाव आहे. कॉंग्रेसचे सदैव असंतुष्ट असलेले मात्र स्वत:ला गांधी कुटुंबाचा निष्ठावान सिद्ध करत असलेले नेते संजय निरूपम यांनीही तीच शंका बोलून दाखवली. कॉंग्रेस संपवायचा दिल्ली ते मुंबई असा एक कट शिजत असल्याचा त्यांना संशय आहे. पवारांचे नाव घेतले जाणे हा त्यातलाच एक भाग आहे. राहुल गांधी यांच्या विरोधातच सगळे कारस्थान असल्याचा निरूपम यांचा दावा आहे. मुळात पवारांनी स्वत:हून काही मागितलेले नाही. मात्र ते चर्चेत आले आहेत. हीच गोष्ट दशक दोन दशकांपूर्वी घडली असती, तर कदाचित वेगळे काही घडूही शकले असते. आज पवारांचे वय पाहता ते त्या उर्जेने काम करू शकतील का, याची खुद्द त्यांनाही शंका असणार. वयाच्या 80 व्या वर्षी भर पावसात सभा घेऊन निवडणूक फिरवण्याची आपली ताकद त्यांनी दाखवली असली, तरी राज्य आणि देश हे पट वेगळे असतात.
भाजपशी सामना करायचा म्हणजे आज एकटे लढून काहीच साध्य होणार नाही. त्याकरता सगळ्यांचीच मोट बांधावी लागणार हे पवारांना कळते. म्हणूनच राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग ते राबवू शकले. पण दिल्लीत ते साध्य करणे म्हणजे पार्ट टाइम जॉब असणार नाही, याची त्यांना कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी या विषयाला अतिरिक्त महत्त्व देण्याचे टाळले. पण पवारांचे नाव घेऊन कॉंग्रेसमधील दिग्गजच कॉंग्रेस श्रेष्ठींना काही सूचवू पाहत आहेत का, हा आणखी एक पर्याय विचार करण्यासारखा आहे. त्याला कारण गेल्या काही काळातील घटनाक्रम. अध्यक्ष पदास नकार देणारे राहुल गांधी आजही पक्षाचे अध्यक्ष म्हणूनच वावरत आहेत. मात्र त्यांच्या नावाला सर्वसंमती नसल्याचे उघड झाले आहे. पक्षातल्या 23 वरिष्ठ नेत्यांनी पक्षातील उणिवांकडे बोट दाखवणारे पत्र सोनिया गांधी यांना पाठवले होते. पवारांनीही अलिकडेच राहुल यांच्याकडे सातत्याचा अभाव असल्याचे विधान केले होते. हे त्या पत्रलेखकांच्या भूमिकेशी सुसंगतच. विशेष म्हणजे जे गेली अनेक वर्षे दहा जनपथचे अर्थात सोनिया गांधींचे निष्ठावान म्हणून ओळखले जातात त्याच नेत्यांनी पत्र शिष्टाई केली होती.
नेत्याचा दबदबा तोपर्यंतच असतो जोपर्यंत तो पक्षाला निधी मिळवून देतो किंवा मते मिळवून देतो. अन् या दोन्ही बाबी परस्परपूरक असतात. निधी देणारे हवेची दिशा पाहूनच निधी देत असतात. गेल्या म्हणजे 2014 नंतरच्या सर्व निवडणुका पाहता कॉंग्रेसची या आघाडीवर आणि नेतृत्वाची दोन्ही आघाड्यांवर पिछेहाट झाली आहे. केवळ मते मिळवण्यासाठी का होईना पक्षातील प्रस्थापितांना गांधी परिवार हवा होता. एकदा निवडणुका झाल्या की आपापली संस्थाने अथवा खुशामत करून मिळवलेल्या जहागिऱ्या सांभाळण्यातच त्यांनी धन्यता मानली. त्याचीच फळे त्या पक्षाला आज भोगावी लागत आहेत. या अवस्थेत ज्यांची घुसमट होत होती त्यांनी कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. अखेर पक्षाबाहेर जाणेच पसंत केले. खुद्द राहुल यांनाही हा कथित निष्ठावानांनी घातलेला वेढा उठवून बाहेर पडता आलेले नाही. संघर्षाची बीजे तेथेच आहेत व तेच कारण आहे. त्यामुळे राहुल यांच्या नावाला विरोधही आहे. राजीव गांधी यांच्या निधनानंतर जी स्थिती निर्माण झाली होती, तसेच चित्र आज आहे. तेव्हा निष्ठावान गट सोनिया सक्रिय नसल्यातरी त्यांच्या संपर्कात होता.
सोनियांचे आगमन झाले तेही एकमुखी पाठिंब्यातून. मात्र आज सोनिया आणि राहुल दोघेही सक्रिय असताना पक्षाचे ज्येष्ठ नेते जाहीरपणे उणेदुणे काढत आहेत. राहुल यांचे तसेच एकमुखी स्वागत आणि पूर्ण शक्तीने पुनरागमन व्हावे अशी सोनियांची इच्छा आहे. हे काम अहमद पटेल करू शकले असते. मात्र आता त्यांचीही उणीव भासते आहे. अशा स्थितीत आता मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर राहुल यांच्यासाठी मार्ग करण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याची चर्चा आहे. थोडक्यात, पत्रप्रपंचानंतर कॉंग्रेसमध्ये जी शांतता आहे ती दिसते तशी नाही. कोणतीही हालचाल होत नसल्यामुळे आलेल्या अस्वस्थतेतूनच पवार यांचे नाव पुढे करण्याचा डावही खेळला गेला असू शकतो. अर्थात, पवार असले तर काहीही होऊ शकते हे नाकारता येण्यासारखे नसले तरी कॉंग्रेस नेतृत्वाला जागे करण्याचा भाग म्हणूनही ही नावपेरणी असू शकते.