ऍडलेड – इशांत शर्मासारखा अनुभवी गोलंदाज भारतीय संघात नसल्याने त्याची उणीव जाणवेल. मात्र, जसप्रीत बुमराह व महंमद शमी यांच्याकडे अफाट क्षमता असून ऑस्ट्रेलियाचे 20 बळी घेण्यात ते निश्चितच यशस्वी ठरतील, असा विश्वास भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने व्यक्त केला आहे.
सातत्याने दुखापतींचा सामना करावा लागत असल्याने इशांतला या मालिकेतून माघार घ्यावी लागली. त्याची ऑस्ट्रेलियातील कामगिरी अन्य भारतीय गोलंदाजांपेक्षाही जास्त सरस आहे. त्याची उणिव निश्चितच जाणवेल. मात्र, बुमराह व शमी यांनी गेल्या तीन मोसमांत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.
त्यातच ही मालिका ऑस्ट्रेलियात होत असल्याने त्यांच्या स्विंग गोलंदाजीला अनुकूल असे वातावरण मिळेल व त्याचा लाभ हे दोन्ही गोलंदाज घेतील. खरेतर भारतीय गोलंदाजांपेक्षा ऑस्ट्रेलियाच्या नवोदित फलंदाजांवरच जास्त दडपण असेल व ते या दोन्ही गोलंदाजांच्या पथ्यावरच पडेल, असेही रहाणे म्हणाला.
इशांतच्या अनुपस्थितीतही भारतीय गोलंदाज 20 बळी घेऊ शकतात. माझ्या मते भारतीय संघात खूप चांगले आणि आश्वासक जलदगती गोलंदाज आहेत. या दोन्ही गोलंदाजांच्या मदतीला रवीचंद्रन अश्विनची फिरकीही यजमान संघाला भारी पडेल. ऑस्ट्रेलियामधील वातावरणात कशी गोलंदाजी करायची याची त्यांना जाणीव आहे.
त्यामुळे चांगली सुरुवात करणे आवश्यक आहे. हे दोघेही गोलंदाज 20 बळी घेऊ शकतात, असेही रहाणे म्हणाला. अमिरातीत झालेल्या आयपीएल स्पर्धेत इशांतला दुखापत झाली होती. यानंतर आता तो बेंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत फिटनेसवर काम करत आहे.