केबलचोरीचा फटका : गावच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
टाकवे बुद्रुक – येथील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, अनुचित प्रकार घडू नये, चोरीच्या घटनांमध्ये होणारी वाढ तसेच गुन्हेगारी रोखता यावी यासाठी दोन वर्षांपूर्वी टाकवे ग्रामपंचायतीकडून पाच लाख रुपये खर्च करून गावात 25 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. मात्र, गेल्या काही महिन्यापासून बहुतांश कॅमेरे बंद अवस्थेत आहेत. परिणामी गावच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
टाकवे बुद्रुक येथे 40 गावची मुख्य बाजारपेठ असून, दर सोमवारी आठवडे बाजार याठिकाणी भरवला जातो. शाळा, कॉलेज, बॅंका तसेच औद्योगिक वसाहत परिसरात आहेत. सतत नागरिकांची वर्दळ असल्याने पाकीट मारणे तसेच छेडछाड अशा घटना होऊ नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे तिसरा डोळा म्हणून काम पाहत होते; यामुळे पोलीस प्रशासनाला मोठी मदत होताना दिसत होती; परंतु सध्या गावात एकूण बसविण्यात आलेल्या 25 पैकी फक्त सात सीसीटीव्ही कॅमेरे फक्त कार्यान्वित असल्याने निदर्शनास आले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाला सीसीटीव्ही बंद असल्याबाबत विचारले असता सीसीटीव्ही जोडण्यात आलेली मुख्य केबल चोरीला गेली असल्याने काही भागातील कॅमेरे बंद असल्याचे सांगण्यात आले.
टाकवे मुख्य म्हाळसाकांत चौक मुख्य बाजारपेठ आंबेडकर चौक या परिसरात गर्दीचे प्रमाण अधिक आहे, तसेच छोटे-मोठे एकूण दीडशे दुकाने बाजारपेठ असल्याने या सर्व मीरची कॅमेऱ्यांची दुरुस्ती लवकरात लवकर करावी, अशी मागणी व्यापारी वर्ग तसेच नागरिक करीत आहेत.
कोणत्या परिसरातील कॅमेरे सुरू
भैरवनाथ मंदिर परिसर
विठ्ठल रुक्मिणी रस्ता परिसर
ग्रामपंचायत कार्यालय
जिल्हा परिषद शाळा परिसरात
या परिसरातील कॅमेरे बंद
टाकवे मुख्य प्रवेशद्वार
म्हाळसकांत चौक
प्राथमिक आरोग्य केंद्र रस्ता
बस स्टॉप परिसर
बाबासाहेब आंबेडकर चौक
गुन्हेगारी रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे महत्वपूर्ण कामगिरी बजावत असतात. अनुचित प्रकार घडल्यास गुन्हेगार पकडण्यासाठी मोठी मदत होते. बंद असलेले कॅमेरे त्वरित कार्यान्वित करावेत, याकरिता वारंवार ग्रामपंचायतीला कळविले आहे.
– अतुल असवले, पोलीस पाटील
चोरीला गेलेली केबल नवीन मागवण्याचे आदेश दिले आहेत. केबल आल्यावर गावातील सर्व कॅमेरे लवकर कार्यान्वित होतील.
– सुभाष बांगर, ग्रामविकास अधिकारी, टाकवे बुद्रुक.