नवी दिल्ली – फटाक्यांविना दिवाळीची कल्पनाही करवत नाही. मात्र 2020 या संपूर्ण वर्षालाच करोनाने ग्रासल्याने अनेक व्यवसायांची कंबर मोडली असून त्यात प्रामुख्याने फटाका व्यवसायाला खूप मोठा फटका बसणार आहे.
वायू प्रदूषण आणि करोना आशा दोन्ही संकटांना टाळण्यासाठी नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल (एनजीटी) ने 9 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या काळात दिल्ली-एनसीआरमध्ये फटाके जाळण्यावर पूर्ण बंदी घातली आहे. दिल्लीनंतर महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये फटाके उडविण्यावर अंशतः निर्बंध घालण्यात आले आहेत. इतर राज्यांसाठी एनजीटीने असे सांगितले आहे की जिथे हवेची गुणवत्ता चांगली असेल तेथे दिवाळीत हिरवे (ग्रीन) फटाके उडवले जाऊ शकतात.
अशा परिस्थितीत दिवाळीपूर्वी फटाके विक्री आणि त्या जाळण्यावर राज्यांनी घातलेल्या निर्बंधांमुळे व्यावसायिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. तामिळनाडूच्या शिवकाशीत गंभीर चिंता आहे कारण देशात विकले जाणारे 80 टक्के फटाके एकट्या शिवकाशीमध्ये बनवले जातात. क्रॅकर व्यवसायातून सुमारे पाच लाख लोकांना रोजगार मिळतो, अशी माहिती आहे.
देशात फटाका व्यवसाय किती आहे?
अखिल भारतीय फटाके असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, शिवकाशीमध्ये 1070 कंपन्या नोंदणीकृत आहेत. गेल्या वर्षी एकट्या शिवकाशीमध्ये 6000 कोटींची उलाढाल झाली. तर संपूर्ण देशातील एकूण फटाक्यांची उलाढाल सुमारे 9000 कोटी रुपयांची आहे. शिवकाशीतील फटाका व्यवसायाचा थेट संबंध तीन लाख लोकांशी आहे. तर एकूण पाच लाख लोकांना यातून रोजगार मिळतो.
फटाक्यांची आयात किती?
पेट्रोलियम आणि विस्फोटक सुरक्षा संघटनेने स्फोटक नियम 2008 अंतर्गत फटाके आयात करण्याचा कोणताही परवाना मंजूर केलेला नाही. तरीही देशातील सुमारे 30 टक्के फटाके बेकायदेशीरपणे चीनमधून येतात. वास्तविक, चिनी फटाके भारतीय फटाक्यांपेक्षा 30 ते 40 टक्के स्वस्त आहेत आणि सहजपणे फुटतात. चिनी फटाके निवडण्यामागे हेच कारण आहे.
यावर्षी फटाके किती महाग असतील?
यावर्षी देशात फटाक्यांची किंमत 10 ते 15 टक्के अधिक असेल. त्यामागील मुख्य कारण म्हणजे चिनी फटाक्यांवर यावर्षी प्रतिबंध आहे. यासह, हिरव्या (ग्रीन) फटाक्यांकडे पारंपारिक फटाक्यांपेक्षा जास्त जोर देण्यात येत आहे, कारण त्यांच्यामुळे होणारे प्रदूषण 40 ते 50 टक्के कमी आहे, ज्यामुळे फटाक्यांची किंमत वाढेल. हिरव्या फटाक्यांची तुलनात्मक किंमत जास्त असणार.