लोणावळा- मावळ तालुक्यात सुरु असलेल्या संततधार पावसाने सर्वच धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मावळ तालुक्यासह पिंपरी चिंचवड शहर परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या मावळ तालुक्यामधील पवना धरणामध्ये 57 टक्के पाणीसाठा झाला आहे.तर वडिवळे धरणातील पाणसिाठा 85 टक्क्यांवर पोचला आहे.
मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पवना धरणाच्या पाणी साठ्यामध्ये दैनंदिन वाढ होऊ लागली आहे. ही शहर व मावळ वासियांसाठी समाधानाची बाब म्हणावी लागेल. यावर्षी पावसाला उशिरा सुरुवात झाल्यामुळे पवना धरणातील पाणीसाठ्याने तळ गाठला होता. यामुळे नागरिकांवर पाणी कपातीचे संकट उभे राहिले होते. आता मात्र धरणाच्या पाणी साठ्यामध्ये वाढ होत असल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
कासारसाई धरणामध्ये 54.73 टक्के, आंद्रा धरणात 60.36 टक्के, वडिवळे धरणात 84.73 टक्के. टाटा कंपनीच्या ठोकळवाडी धरणात 54.38 टक्के, शिरोटा धरणात 50.56 टक्के, वलवण धरणात 55.71 टक्के, लोणावळा धरणात 77.65 टक्के पाणीसाठा झाला आहे.