पुणे – करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जेईई मेन्स परीक्षेसाठी गेल्या तीन वर्षांत बारावीला किमान 75 टक्के गुण अनिवार्य असल्याची अट शिथिल करण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा जेईई मेन्स या प्रवेश परीक्षेसाठी बारावीला किमान 75 टक्के गुण अनिवार्य असल्याची अट लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णय एक वर्ष पुढे ढकलण्याची मागणीला जोर धरू लागली आहे.
नॅशलन टेस्टिंग एजन्सीद्वारे (एनटीए) अभियांत्रिकी, तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या केंद्रीय संस्थांतील प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या जेईई मेन्स ही प्रवेश परीक्षा राबविली जाते. “एनटीए’ने जेईई मुख्य परीक्षेचे वेळापत्रक नुकतेच प्रसिद्ध केले. त्यानुसार जेईई मुख्यच्या पहिल्या सत्राची परीक्षा 24 ते 30 जानेवारी 2023 या कालावधीत, तर दुसऱ्या सत्राची परीक्षा 6 ते 12 एप्रिल 2023 या दरम्यान होणार आहे. जानेवारीत होणाऱ्या पहिल्या सत्राच्या परीक्षेसाठीची नोंदणी प्रक्रियाही “एनटीए’कडून सुरू करण्यात आली. त्यासाठी अर्ज करण्यासाठीची अंतिम मुदत 12 जानेवारी आहे.
दरम्यान, “एनटीए’ने जेईई मुख्य परीक्षा 2023 या वर्षातील प्रवेशाची माहितीपुस्तिका प्रसिद्ध केली. त्यात अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, वास्तुकला आणि नियोजन पदवी अभ्यासक्रमांच्या एनआयटी, आयआयआयटीसह केंद्र सरकारचे अनुदान मिळणाऱ्या संस्थांतील प्रवेशासाठी बारावीला किमान 75 टक्के गुण, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना किमान 65 टक्के गुणासह सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण होणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले आहे. 2020 ते 2022 या तीन वर्षात करोनाच्या पार्श्वभूमीवर ही अट शिथिल केली होती. आता पुन्हा पूर्वीची अट लागू करण्यात येत आहे. या निर्णयाला विरोध होत असून, ही अट शिथिल करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.
एनटीएकडून करोनानंतर परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर बारावीला किमान 75 टक्के अनिवार्यतेची अट पुन्हा समाविष्ट होणे अपेक्षित होते. मात्र, 2022 मध्ये बारावीत कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. बारावीत किमान
75 टक्के अनिवार्यतेची अट लागू केल्यास हे विद्यार्थी अपात्र ठरतील. त्याचा विचार होणे आवश्यक आहे.
– प्रा. दुर्गेश मंगेशकर संचालक, आयआयटीन्स प्रशिक्षण केंद्र