जिल्ह्यात शिंदे गटाची जोरदार मुसंडी
बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीने वर्चस्व राखले
सातारा तालुक्यातील काशिळ ग्रामपंचायतीत सत्तांतर
महाबळेश्वरमध्ये मुख्यमंत्री गटाचा झेंडा फडकला
सातारा जिल्ह्यात एकूण 259 ग्रामपंचायतीच्या मतमोजणीमध्ये अनेक ठिकाणी सत्तांतराचे चक्र हेलकावत राहिले. यापैकी 60 ग्रामपंचायती पूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. निवडणुकीसाठी 4542 उमेदवार रिंगणात होते. सुमारे चार लाख 50 हजार मतदारांपैकी तीन लाख 55 हजार 254 मतदारांनी हक्क बजावला. ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतमोजणीनंतर मंगळवारी शिंदे गट आणि भाजप युतीने राष्ट्रवादी कॉंग्रेसला कडवी टक्कर दिल्याचे चित्र स्पष्ट झाले. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने सर्वात जास्त ग्रामपंचायती मिळवत बालेकिल्ला सांभाळताना वर्चस्व सिद्ध केले.
धक्कादायक निकालांमध्ये कराड तालुक्यातील पश्चिम सुपने ग्रामपंचायतीचा निकाल ठरला. तिथे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि ऍड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या गटांनी प्रत्येकी चार जागांवर विजय मिळवला तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराने सरपंचपदावर विजय मिळवला. महाबळेश्वर तालुक्यामध्ये शिंदे गटाने जोरदार मुसंडी मारली. महाबळेश्वरच्या लाखवड ग्रामपंचायतीत एकनाथ शिंदे गटाच्या रूपाली संकपाळ सरपंचपदी आल्याने राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांच्या गटाला धक्का बसला. तर वेंगळ ग्रामपंचायतीवर शिंदे गटाच्या शोभा संकपाळ विजयी झाल्या.
सातारा तालुक्यातील अपशिंगे ग्रामपंचायत भाजपकडे गेली असून भाजपच्या तुषार रिकामे यांना 912 तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संतोष निकम यांना 832 मते पडली. अपशिंगे ग्रामपंचातीमध्ये राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे. कोरेगाव मतदारसंघातील देगाव (ता. सातारा) ग्रामपंचायतीत आ. महेश शिंदे गटाच्या वैशाली साळुंखे सरपंचपदी विजयी झाल्या. शिंदे गटातील सातारा तालुक्यातील ही एन्ट्री महत्त्वपूर्ण मानली जात आहे. राष्ट्रवादीच्या कांचन साळुंखे यांचा पराभव झाल्याने आ. शिवेंद्रसिंहराजे गटाला येथे धक्का बसला आहे. सातारा तालुक्यातील क्षेत्र माहुली या गावात आमदार महेश शिंदे यांनी केलेली राजकीय पेरणी यशस्वी ठरली आणि येथे त्यांच्या गटाने सत्ता मिळवली आहे. आमदार शशिकांत शिंदे यांच्या अनेक सत्ताकेंद्रांना महेश शिंदे यांनी धक्का दिल्याने पुन्हा एकदा “शिंदे विरुद्ध शिंदे’ हा सातारा तालुक्यातील पण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील “हाय व्होल्टेज ड्रामा’ चर्चेचा विषय ठरला आहे.
सातारा तालुक्यीातल माळ्याची वाडी ग्रामपंचायतीमध्ये अरुण कापसे यांनी पुन्हा एकदा एकहाती सत्ता राखल्याने सलग सातव्यांदा त्यांचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. अरुण कापसे यांना 257 मते मिळाली. तर विशाल कापसे यांना 91 मध्ये मिळाली. सातारा तालुक्यात काशीळ ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले. भाजपने सत्ता मिळवली. राष्ट्रवादीला हा पराभव जिव्हारी लागणारा आहे. कोरेगाव तालुक्यातील रामोशीवाडी ग्रामपंचायत राष्ट्रवादीकडे कायम राहिली. येथे शशिकांत शिंदे गटाने आठ शून्य असा एकतर्फी विजय मिळवला. माण तालुक्यामध्ये महिमानगड ग्रामपंचायत शिंदे गटाकडे गेली असून धुळदेव ग्रामपंचायतीवर भाजपने वर्चस्व राखले आहे. पाटण तालुक्यातील नाटोशी ग्रामपंचायत देसाई गटाकडे कायम राहिली तर म्हावशी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने वर्चस्व राखले. निवकणे ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार विजयी झाल्याचे स्पष्ट झाले.
कराड तालुक्यातील मनव आणि जळगाव येथे उदयसिंह पाटील उंडाळकर यांची सत्ता कायम राहिली तर दुशेरे आणि या ग्रामपंचायती भाजपच्या डॉक्टर अतुल भोसले यांनी राखल्या आहेत अतुल भोसले यांनी या ग्रामपंचायत साठी प्रचंड मेहनत घेतली होती राष्ट्रवादीचे दिग्गज नेते बाळासाहेब पाटील यांनी हिंगनोळी हेळगाव पाडळी अंतवडी येथे पाटील गटाने सत्ता कायम राखली आहे कराड तालुक्यातील अंतवडी ग्रामपंचायत सत्तांतर झाले असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाला जोरदार धक्का बसला आहे येथे बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला