सातारा -रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे सातारा जिल्ह्यातील 50 नागरिक तेथे अडकून पडले आहेत. या नागरिकांना लवकरात लवकर मायदेशी आणण्यासाठी जिल्हा नियंत्रण कक्षाचा केंद्र शासनाच्या परराष्ट्र विभागातील सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने ही माहिती देण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे नियंत्रण अधिकारी देविदास ताम्हाणे सातत्याने परराष्ट्र विभागाच्या संपर्कात असून प्राप्त माहितीनुसार केंद्र शासनाने एक विमान रुमानिया येथे पाठवले असून तेथून भारतीय विद्यार्थ्यांची घरवापसी होणार असल्याचे सांगण्यात येते. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशाप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने युक्रेनमध्ये अडकलेल्या जिल्ह्यातील रहिवाशांची माहिती प्राप्त होण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. येथील 50 जण तेथे अडकल्याची भीती आहे.
कदाचित हा आकडा वाढूही शकतो असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. राधिका बाग, भुजबळ, सुभाष त्रिवेदी अशी काही नावे आपत्ती व्यवस्थापन कक्षाने केलेल्या चौकशीत मिळाली आहेत. या सर्वांना देशात सुखरूप आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तसेच खासदार उदयनराजे भोसले व खासदार श्रीनिवास पाटील यांनीही दिल्लीतील नियंत्रण कक्षाचे उच्चायुक्त पी. व्ही. मिश्रा व कक्षाशी संपर्क करून युक्रेनमधील भारतीय नागरिकांना आणण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत.