पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शनिवारी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने पुण्यात आले होते. मात्र, ठाकरे यांनी राजकीय भाष्य टाळले. सध्या राज्यात वेगवेगळ्या राजकीय घटना होत असताना, त्यावर काहीच न बोलता राज ठाकरे निघून गेले. त्यावरून राजकीय चर्चा होत आहे.
महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी जोरात सुरू आहे. त्यातच राज ठाकरे पुण्यात येणार असल्याने पक्षाविषयी काही भूमिका, निर्णय जाहीर होतील, याकडे सर्वांच लक्ष होते. तसेच ठाकरे यांनी शनिवारी रविवार पेठ आणि सिंहगड रस्ता येथील पक्षातील इच्छुकांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. आगामी पालिका निवडणुकीच्या दृष्टीने “राज’कीय फटकेबाजी होतील, अशी अपेक्षा होती. तसेच पुण्यात दिवाळी अंकाच्या प्रकाशनच्या कार्यक्रमात त्यांची उपस्थिती होती. त्यानंतर पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते काहीच न बोलल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
सध्या राष्ट्रवादी पक्षाचे नबाव मलिक, भाजपचे किरीट सोमय्या, उद्धव ठाकरे कुटुंबीयांवर होणारे आरोप, मराठी भाषेला अभिजात दर्जा, असे अनेक प्रश्न सध्या चर्चेत आहे. या प्रश्नांवर राज ठाकरे प्रतिक्रिया देतील, अशी अटकळ बांधली जात होती.