पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना मोठ्या बांधकामासाठी २२ कोटींचा निधी वितरीत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यातील ४८८ शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांनी सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने १० शाळा या योजनेतून वगळण्यात आल्या असून, आता विकसित करावयाच्या आदर्श शाळांची संख्या ४७८ इतकी आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेसाठी ४७९ कोटी ४८ लाख इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय व वित्तीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
शाळांपैकी प्राथमिक व उच्च प्राथमिक २९३ शाळा व माध्यमिक व उच्च माध्यमिक ६२ शाळा अशा एकूण ३५५ शाळांच्या लहान बाधकामांना सन २०२१-२२ मध्ये ५३ कोटी ९७ लाख निधी दिला होता. सन २०२२-२३ मध्ये २६७ प्राथमिक व ६१ माध्यमिक अशा एकूण ३२८ शाळांना १८३ कोटी ६४ लाख निधी वितरीत झाला आहे.
सन २०२३-२४ मध्ये प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांसाठी १९९ कोटी ४० लाख रुपये अर्थसंकल्पित निधीपैकी वित्त विभागाने १६५ कोटी ९२ लाख एवढा निधी वितरीत करण्यास सहमती दर्शविली होती. माध्यमिक शाळांसाठी ५६ कोटी १२ लाख इतक्या अर्थसंकल्पित निधीपैकी २२ कोटी ४५ लाख इतका निधी वितरीत करण्यास सहमती दर्शविली होती.
त्या वेळी आतापर्यंत ज्या शाळांना कोणताही निधी प्राप्त झाला नाही, त्या शाळांना निधी देण्यात आला होता. प्राथमिक, उच्च प्राथमिक शाळांना अपुरा निधी प्राप्त झाला होता. शाळांच्या मोठ्या बांधकामांसाठी निधी खर्च करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. शिक्षण आयुक्त यांना बांधकामावरील खर्चाचा वेळोवेळी आढावा घ्यावा लागणार आहे.