खालापूर, (वार्ताहर) – उन्हाळ्याच्या सुरवातीलाच खालापूर तालुक्यातील धरण श्रेत्रातील पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली असून मार्च महिन्यातच काही गावांना पाण्याची टंचाई भासू लागली आहे. परिणामी यंदा पाणी टंचाईचे सावट तालुक्यात येणार असल्याचे चित्र दिसत आहे.
नुकतेच वावोशी ग्राम पंचायतीने टॅकरच्या माध्यमातून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुरू केल्याने तेथील पाणी टंचाईची तीव्रता दिसून आली. डोणवत धरणातील पाणी साठा ५० टक्यांवर आला असून या धरणातून औद्योगिक वसाहतींना पाणी दिले जाते. ते बंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
याच धरणाच्या पाण्यावर परिसरातील जलजीवन योजना राबविण्याचे काम सुरू आहे. या धरणातील पाणी साठा झपाट्याने कमी होत असताना भविष्यात या योजनांचे काय होणार असाही प्रश्न पुढे येत असून पावसाळा सुरू होईपर्यंत पुरविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.पंचायत समितीकडे टंचाईग्रस्त गावांची नोंदच नाही
खालापूर पंचायत समितीने जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या अहवालात तीन गावे व १४ वाड्यांच आगामी वर्षात टंचाईग्रस्त होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यात उसरोली, उजळोली व तलाशी या तीन गावांसह चिलठण बुध्द भूषण नगर, खडई वाडी, खानाव आदिवासी वाडी, हाळखुर्द वाडी, मधला हाळ, वळवण,
उंबरविरा ठाकूरवाडी, चिंबोडा ठाकूरवाडी, बिवळावाडी, खोडावाडी, मुठा माडप, सारंग वाडी, गारमाळ, निफाड वाडी या चौदा वाड्यांच्या समावेश आहे. मात्र, या व्यतिरिक्त वावोशीसारखी अनेक गावे आहेत, की ज्यांच्यावर पाणीसंकट आले आहे. असे असताना पंचायत समिती कोणत्या निकषांवर अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठविला जातो, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
टंचाईग्रस्त गावांकडे दुर्लक्ष
वावोशी गाव, भीमनगर व आदिवासीवाडी तसेच परखंदे धनगरवाडा, नंदनपाडा आदी गावात पाणी टंचाई भासायला सुरूवात झाली आहे. मात्र, याचा पंचायत समितीच्या आराखड्यात समावेश नाही. तसेच खालापूर तालुक्यात अनेक जलजीवन योजनेच्या माध्यमातून मोफत पाणी पाण्याचे मिशन शासनाच्या माध्यमातून सुरू झाले आहे. मात्र, या योजनांना पाण्याचा दाखविलेला स्तोत्र चुकीचा ठरत असल्याने अनेक योजना पाण्याविनाच बंद पडतात का? असे प्रश्न आहे.