सीमाप्रश्न सोडविण्यासाठी सागरी प्रांताचा तोडगा
निपाणी, दि. 1 – “गेली वीस वर्षे भिजत पडलेला कर्नाटक-महाराष्ट्र सीमा तंटा पाटसकर निवाड्यानुसार खेडे घटक, बहुभाषिक सलगता हे निष्कर्ष लावून सोडविण्यास अगर दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यामध्ये एकत्र येऊन प्रश्न निकालात काढण्यास विलंब लागत आहे; तरी वादग्रस्त सीमा भाग गोव्यास जोडून एक सागरी प्रांत करावा आणि एकदाचा हा प्रश्न निकालात काढला जावा, असे निवेदन पंतप्रधान इंदिरा गांधी या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्या असताना निपाणी भागातील मराठी भाषिक नेत्यांनी देल्याचे कळते.
तसेच कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद त्वरित सोडवून सीमाभागातील जनतेला न्याय द्यावा, या एकाच वाक्याचे छापील निवेदनही पंतप्रधानांना दिले.
जीवनाचे मर्म सांगणारी पुस्तके घरात आणावीत
महाड – जीवनाचे मर्म सांगणारी पुस्तके महिलांनी वाचली पाहिजेत आणि अशी पुस्तके आपल्या घरात येतील असा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे, असे आवाहन सुप्रसिद्ध साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी महाड येथे “कलंकिता न तू…’ या कादंबरीच्या प्रकाशन समारंभात बोलताना केले.
अलीकडच्या साहित्यात तण उदंड माजले आहे, असे सांगून अशा तऱ्हेचे निरुपयोगी साहित्य आपल्या घरात येणार नाही, असा वाचकांनी प्रयत्न केला पाहिजे, असे ते म्हणाले. कर्णिक यांनी इरावती कर्वे व दुर्गा भागवत यांच्या लेखनाचा नामनिर्देश करून रणजीत देसाई यांची “स्वामी’ व वि. स. खांडेकर यांची “ययाति’ या सारख्या कादंबरीचा आवर्जून उल्लेख केला.