मुंबई – लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पावले उचलली आहेत. राज्यात सायबरसंदर्भात 433 गुन्हे दाखल झाले असून 234 जणांना बेड्या ठोकल्या आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली.
राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये 26 मे पर्यंत एकूण 433 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. महाराष्ट्र सायबरने दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये व्हाट्सअप मेसेजेस फॉरवर्ड केल्याप्रकरणी 181 गुन्हे, तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्याप्रकरणी 170 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
टिकटॉक व्हिडिओ शेअर प्रकरणी 22 गुन्हे दाखल झाले आहेत. ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी 8 गुन्हे, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी 4 गुन्हे तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, यूट्यूब) गैरवापर केल्या प्रकरणी 48 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत 234 आरोपींना अटक केली आहे तर यापैकी 105 आक्षेपार्ह पोस्ट्स टेकडाऊन करण्यात यश आले आहे.