जळगाव – येथील बांभोरी गावाजवळ वाळूचा ट्रक आणि क्रूझर यांची धडक झाली. ही धडक एवढी भीषण होती की तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांपैकी काही जण ओंकारेश्वर येथे महादेवाची पिंड घेण्यासाठी जाणाऱ्या भाविकांपैकी होते. मात्र त्यांचा अकाली मृत्यू झाला. ( Jalgaon Accident)
तुषार जाधव, विजय हिंमतराव चौधरी आणि भूषण सुभाष खंबायत अशी मृतांची नावे असून ते तिघेही जळगावमधील रहिवासी आहेत. तर इतर चौघे जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा सामान्य रुग्णालयात नातेवाईकांनी धाव घेतली असून मोठी गर्दी जमलेली आहे. दरम्यान अपघातग्रस्त ट्रक हा अवैधपणे वाळूची वाहतूक करत असल्याची माहिती समोर आली आहे.
ठरलेल्या नियोजनानुसार परिसरातील ७ ते ८ जण सकाळी पावणेसातच्या सुमारास घरून निघाले. घरातील सर्व मंडळी व मंदिर ट्रस्टीची भेट घेऊन भगवान शंकरचा जयजयकार करत मार्गस्थ झाले. मात्र घरापासून अवघ्या पाच मिनिटांचा अंतरावरच बांभोरी (ता. धरणगाव) गावाजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने या भाविकांच्या गाडीला जोरदार धडक दिली. घटनेनंतर मृतांच्या कुटुंबियांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला.