मुंबई : आयटीसी प्रा. लि. कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 2 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. करोनाविरुद्धच्या लढ्यात ते ही शासनासमवेत सहभागी झाले आहेत. या युद्धात त्यांनी आर्थिक मदतीशिवाय अन्नधान्य वितरण, स्वच्छताविषयक साधनांची तसेच गरजू लोकांच्या जेवणाची व्यवस्था यासारख्या कामात देखील पुढाकार घेतला आहे.
समाजाप्रतीच्या दायित्व भावनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रक्कम जमा करणाऱ्या दात्यांचे मदतीचे हात अनमोल आहेत. या संकटकाळात बालकांनीदेखील मदतीचा हात पुढे केला आहे. ही मदत फक्त पैशात सांगता किंवा मोजता येत नाही. कुणी अडकलेल्या नागरिकांना जेवण देत आहे. कुणी रुग्णालयातील पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी मदत करत आहे, कुणी वस्तू रुपाने तर कुणी अन्नधान्याच्या स्वरुपात मदत करत आहे.
समाजाप्रतीच्या दायित्व भावनेतून केलेल्या या मदतीला कृतज्ञतेचे कोंदण आहे म्हणून त्यांचे हे दातृत्व विलक्षण शोभून दिसत आहे. या दातृत्वभावातूनच आतापर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 280 कोटी रुपये जमा झाले आहेत. या सगळ्यांच्या मदतीसाठी आणि लाखमोलाच्या साथीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सातत्याने सर्व जनतेचे आभार मानले आहेत.