इतर देशांच्या तुलनेत भारताची परिस्थिती सुधारली
पुणे – भारतात 2019 मध्ये प्रत्येक महिन्याला होणाऱ्या अनोळखी कॉलमध्ये सर्वसाधारणपणे 15 टक्के वाढ झाली आहे. मात्र, यामुळे हैराण असलेल्या इतर देशांच्या तुलनेत भारताची परिस्थिती थोडीशी सुधारली आहे.
जागतिक पातळीवर अनोळखी कॉलचा आढावा ट्रू-कॉलर या संस्थेतर्फे घेण्यात आला. या संस्थेने उपलब्ध केलेल्या माहितीनुसार, 2018 मध्ये भारत अनोळखी कॉलमध्ये ब्राझीलनंतर दुसऱ्या क्रमांकावर होता. मात्र, आता पाचव्या क्रमांकावर आला आहे. गेल्यावर्षी भारतामध्ये सर्वसाधारणपणे प्रत्येक महिन्याला प्रत्येक व्यक्तीला 25 अनाहुत कॉल आले.
ब्राझील, इंडोनेशिया, मेक्सिको या देशांत त्याचे प्रमाण जास्त आहे. पहिल्या 10 देशांत द. आफ्रिका, रशिया, अमेरिका, कोलंबिया यांचा समावेश आहे. अनोळखी “एसएमएस’ पाठविले जाण्यातही भारत आठव्या क्रमांकावर आहे. भारतात प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक महिन्याला 65 अनोळखी “एसएमएस’ येतात. दक्षिण आफ्रिका आणि केनियात त्याचे प्रमाण जास्त आहे. भारतात अनोळखी कॉलमध्ये 10 टक्के कॉल वित्तीय सेवा पुरवठादारांकडून होतात. कंपन्या आणि संस्थांच्या सेवा तसेच सेवा संदर्भात आठवण अशा प्रकारचे कॉल असतात. 17 टक्के टेलिमार्केटिंग कंपन्या तर, 6 टक्के फसवेगिरीचे असतात.
कंपन्या आणि सरकारकडून प्रयत्न
कॉल आणि एसएमएसद्वारा महिलांना त्रास देण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यानुसार भारतात 30 टक्के महिलांना अशा प्रकारचे कॉल किंवा एसएमएस आल्याचा अनुभव आला असल्याचे ट्रू-कॉलर या संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे. कंपन्या आणि सरकार असे कॉल कमी व्हावेत यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे आगामी काळात या कॉलची संख्या कमी होण्याची शक्यता आहे.