– नुकसान भरपाईसाठी लवकरच नवीन निकष
मुंबई: निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यासह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही मोठा फटका बसला आहे. या संकटाचे परिणाम गंभीर असले तरी सरकार पूर्ण ताकदीने कोकणवासीयांच्या पाठीशी उभे राहील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच त्यांनी तातडीची मदत म्हणून रत्नागिरीला 75 कोटी आणि सिंधुदुर्गला 25 कोटी रुपये जाहीर केले.
निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर या जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतला. यावेळी लोकप्रतिनिधींच्या सूचना ऐकल्या. तसेच प्रशासनाला योग्य ते निर्देश दिले.
उद्धव ठाकरे म्हणाले, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात तुलनेने कमी नुकसान झाले आहे. मात्र, तेथीलही आढावा घेतला जाईल. हे पॅकेज नसून तातडीची मदत आहे, असेही त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. तसेच नैसर्गिक आपत्तीत नुकसान भरपाईचे जुने निकष बदलण्याची गरज असून नवे सुधारित निकष कसे असावेत त्याबाबत प्रशासनाने लवकरच माहिती सादर करावी म्हणजे निर्णय घेता येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मदत कार्य करताना तुम्ही प्राधान्य ठरवा, लोकांना विश्वासात घ्या. कुठलाही गैरसमज पसरू देऊ नका. प्रशासनातले अधिकारी आणि कर्मचारीसुद्धा माणसेच आहेत, मनुष्यबळाचे योग्य नियोजन करा, पंचनामे तातडीने करून पाठवा, जिथे ठप्प झालेले असेल तिथे दळणवळण तातडीने सुरू करा, मोठ्या प्रमाणावर विजेचे खांब पडले असून तातडीने वीज पुरवठा सुरू करावा. अंतर्गत रस्ते दुरुस्त करून घ्या. आता पाऊस येईल त्यामुळे अधिक मोठे आव्हान असेल. लहान लहान दुकानदार, व्यावसायिक, मूर्तीकार, मच्छीमार यांना तातडीने मदत करा, अशा सूचना त्यांनी केल्या.
तसेच करोनाच्या संकटाचे आव्हान असताना आपण ज्या धैर्याने या वादळाचा सामना केला त्याला तोड नाही. जिल्हा प्रशासन, पोलीस, एनडीआरएफ, या जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था, कोळी बांधव, इतर संघटना या सर्वांनी धीराने मुकाबला केला, या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे कौतुक केले.