सातारा -जिल्ह्यातील शंभर शाळा मॉडेल शाळा बनवण्याचा जिल्हा परिषदेचा प्रयत्न आहे. यासाठी कंपन्यांच्या सीएसआर फंडाच्या माध्यमातून प्रयत्न होत आहेत. जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढवण्यावर आपला भर राहणार असून करोनाच्या संकटाचा सामना करत विकास कामांना गती देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दै. “प्रभात’शी बोलताना दिली.
राज्य शासनाने यापूर्वीच जिल्हा परिषदेच्या दहा शाळांची मॉडेल म्हणून निवड केली आहे. या धर्तीवर जिल्ह्यातील शंभर शाळा मॉडेल बनवण्यावर आपला भर राहणार आहे. त्यानुसार उपाययोजना करण्यात येत आहेत. कंपन्यांच्या सीएसआर फंडातून शाळांचा विकास करण्यात येणार आहेत. आगामी काळात आणखी उपक्रम राबवण्यात येणार आहेत. काम करताना अधिकारी, कर्मचाऱ्यांची चांगली साथ मिळत असून विकास कामे आणखी गतीने आणि चांगल्या दर्जाची कशी होतील याची काळजी घेतली जात आहे. जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन देण्यात येणार आहे. जिल्ह्यात याबाबतही काम सुरु असून पुढील महिन्यापासून या कामास आणखी गती मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्याचा विस्तार मोठा आहे. जिल्ह्याला गतीने काम करण्याची सवय आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. कररोनाचे संकट निश्चित आहे. मात्र, या संकटाचा सामना करत विकास कामेही झाली पाहिजेत यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. विविध विभागांचा आढावा घेताना आढळून आलेल्या त्रुटी सुधारण्यात येत आहेत. प्रशासनाला शिस्त लावण्याबरोबर विकास कामे गतीने कशी होतील याकडे लक्ष देण्यात येत आहे. पदाधिकारी- प्रशासनाचा समन्वय साधून आदर्शवत असे काम करण्यात येत आहे. सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून कामकाज होत असल्याचे विनय गौडा यांनी स्पष्ट केले.