सातारा – अवघ्या दहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढविणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ. शशिकांत शिंदे यांनी काल (दि. 30 नोव्हेंबर) केली. त्यामुळे सातारा शहरासह जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळले आहे. या निवडणुकांसाठी राष्ट्रवादीने शड्डू ठोकल्याने सातारा शहर व तालुक्यात वर्चस्व असणाऱ्या दोन्ही राजांच्या गटांपुढे कडवे आव्हान उभे राहण्याची चिन्हे आहेत. हे आव्हान पेलण्यासाठी व सातारा पालिकेतील सत्ता अबाधित ठेवण्यासाठी खा. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले हे एकत्र येणार का, याची चर्चा सुरू झाली आहे.
एकेकाळी राष्ट्रवादीत नांदणारे दोन्ही राजे भाजपमध्ये आले. 2016 मध्ये झालेल्या सातारा पालिका निवडणुकीत खा. उदयनराजे यांनी एका दशकाच्या मनोमिलनाला तिलांजली दिली. आ. शिवेंद्रराजे यांच्या पत्नी सौ. वेदांतिकाराजे यांचा पराभव घडवून आणत थेट नगराध्यक्षपदावर सर्वसामान्य कुटुंबातील सौ. माधवी कदम यांना निवडून आणले. ही दोन्ही राजांच्या पुन्हा एकत्र येण्यामधली दुखरी नस आहे. त्यानंतर आनेवाडी टोल नाक्यावरील संघर्ष, सुरुची राडा प्रकरण, न्यायप्रविष्ट प्रकरणातील जुना मोटार स्टॅंडजवळच्या जागेच्या ताब्यावरून उद्भवलेला संघर्ष यातून दोन्ही राजांमधील राजकीय वाद चव्हाट्यावर आला. त्यावेळी पालिका निवडणुकीच्या आखाड्यात भाजपने आपले सहा नगरसेवक निवडून आणले.
गेल्या चार- साडेचार वर्षांत उदयनराजेंची सातारा विकास आघाडी, शिवेंद्रराजेंची नगर विकास आघाडी व भाजप यांच्यात विळ्याभोपळ्याचे नाते राहिले. वर्षभरापूर्वी आ. शिवेंद्रसिंहराजे राष्ट्रवादीतनू भाजपमध्ये दाखल झाले. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेल्या उदयनराजेंनीही खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये उडी मारली. उदयनराजेंचे सोयीस्कर राजकारण जिल्हावासीयांना न पटल्याने थोरल्या पवारांच्या आवाहनानुसार त्यांनी लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजेंचा पराभव घडवून श्रीनिवास पाटील यांना विजयी केले. गेल्या चार वर्षांत सातारा पालिकेच्या राजकारणात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. पालिकेच्या कारभारात सातारा विकास आघाडीने बहुमताच्या जोरावर भाजप व नगरविकास आघाडी यांना कधीच हिंगललेले नाही. आता दोन्ही राजे भाजपमध्ये असले तरी त्यांचा राजकीय प्रवास एकमेकांना समांतरच आहे.
साताऱ्यात सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महाविकास आघाडी लढविणार, अशी घोषणा आ. शशिकांत शिंदे यांनी केल्याने जिल्ह्याच्या राजकारणाला नव्याने उकळी फुटली आहे. या नव्या आव्हानाचा सामना करण्यासाठी दोन्ही राजे एकत्र येणार का, याची चर्चा आता सुरू झाली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत “सस्पेन्स’ ठेवत राजकीय खिचडी शिजवण्यात दोन्ही राजे माहीर आहेत.
पालिका निवडणुकीचा आखाडा दहा महिने लांब असला तरी हद्दवाढीमुळे आणखी 25 किलोमीटर क्षेत्रात विस्तारलेल्या सातारा शहरात दोन्ही राजांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. आ. शिंदे यांची घोषणा प्रत्यक्षात आल्यास आगामी पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, असा दुरंगी सामना होण्याची वरवरची चिन्हे असली तरी भाजपमध्ये खासदार व आमदार गटांमध्ये प्रचंड अंतर्विरोध आहे. त्यामुळे आगामी निवडणूक दुरंगी होईल, असे म्हणणे आता तरी धाडसाचे ठरणार आहे. त्यावेळी निर्माण होणारी परिस्थिती, उदयनराजेंचा “मूड’ आणि आ. शिवेंद्रराजे यांची आगामी रणनीती यावर बरीचशी समीकरणे अवलंबून असतील.
सातारा पालिकेतील सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणा
हद्दवाढीनंतरची पालिका निवडणूक खा. उदयनराजे यांच्यासाठी निश्चितच सोपी नाही. गेल्या चार वर्षांत सातारकरांच्या पदरात भरीव असे काही पडले नाही. नगराध्यक्षांना डावलण्याचे वारंवार झालेले प्रयत्न, साविआतील अंर्तगत गटबाजी, वादग्रस्त विषयांना रेटण्याची मानसिकता, पक्षप्रतोद निशांत पाटील यांची राजकीय विरक्ती, स्वीकृत नगरसेवक दत्ता बनकर यांच्यावरील नाराजी, स्वच्छ भारत अभियानात पालिकेची ढासळलेली कामगिरी, अडीच लाखांच्या लाच प्रकरणात सापडलेले अधिकारी व कर्मचारी, अशा अनेक प्रकरणांमुळे साविआ बॅकफूटवर आहे. काही नगरसेवकांबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
ग्रेड सेपरेटरचे काम जवळपास संपत आले आहे. कास धरणाची उंची वाढविण्याचे काम आणखी सहा महिने सुरू राहणार आहे. हे प्रकल्प तातडीने पूर्ण करून उदयनराजे यांना ही नाराजी कमी करावी लागणार आहे. नगराध्यक्ष माधवी कदम व उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांना विकासकामांची गती वाढवावी लागणार आहे. अंर्तगत गटबाजीमुळे सत्ताधारी गटाच्या अडचणी वाढू शकतात.
उदयनराजे कोणती नीती अवलंबणार?
उदयनराजे यांचे संघटन कौशल्य अफलातून आहे. हद्दवाढीत आलेल्या नव्या भागात नवे नेतृत्व जाणीवपूर्वक शोधून उदयनराजेंना अंर्तगत नाराजी कमी करावी लागणार आहे. महाविकास आघाडीचे आव्हान पेलण्यासाठी भाजपच्या निष्ठावंतांना विश्वासात घेऊन त्यांना पाठबळ द्यावे लागेल. तसे झाले नाही तर भाजपच्या निष्ठावंतांनी वेगळी चूल मांडल्यास आश्चर्य वाटायला नको. पालिकेच्या आगामी निवडणुकीत उदयनराजे कोणती नीती वापरतात, याची उत्सुकता आहे.