कोल्हापूर – कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही मतदारसंघामध्ये शिवसेनेचा भगवा फडकला आहे. कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यात महायुतीकडून लढणाऱ्या शिवसेनेला आत्तापर्यंत यशाने हुलकावणी दिली होती. पण यावेळच्या निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही विद्यमान खासदारांना पराभूत करून दिल्ली वारी करण्यात यशस्वी ठरले आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्यामुळे चर्चेत असलेल्या हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी जवळपास 1 लाख मतांनी विजय मिळवला. येथे राजू शेट्टींना वंचीत बहुजन आघाडीचा फटका बसला असल्याचे मानले जात आहे.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्यामुळे राज्यभरात चर्चेचा आणि लक्षवेधी होता. गेल्यावेळी महायुतीच्यावतीने निवडणूक लढवून शेट्टी हे दुसऱ्यांदा लोकसभेत पोहोचले होते. महायुतीच्या तंबूतून बाहेर पडून शेट्टी यांनी महाघाडीशी जवळीक साधून ही निवडणूक लढवली यावेळी त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले युवा नेते धैर्यशील माने होते. प्रारंभी या लढतीत राजु शेट्टी हे सहजपणे बाजी मरतील असे चित्र होते. पण, अखेरच्या टप्प्यात त्याला टोकाची कलाटणी मिळाली. माने यांच्यादृष्टिने अनेक घटक पथ्यावर पडली. माने यांची मराठा जात त्यावरून केलेला बहुजन समाजाच्या अस्मितेचा मुद्दा, शेट्टी आणि साखर कारखानदारांशी साधलेली जवळीक आणि नवमतदारांना माने यांना दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे माने यांची बाजू अधिकाधिक भक्कम होत गेली. त्याचा प्रत्यय या हातकणंगले लोकसभेच्या निकालातून समोर आला.