वाई – वाई विधानसभा मतदारसंघात विजयी उमेदवार उदयनराजे भोसले यांना मिळालेले मताधिक्य म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने केलेल्या विकास कामांवर जनतेनी ठेवलेला विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया आमदार मकरंद पाटील यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, “”देशात कुणाचीही सत्ता आली तरीही पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाच मानणारा आहे, तसेच त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहत असल्याचे पुन्हा एकदा लोकसभेची निवडणूक निकालावरून सिद्ध झाले आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत वाई विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाचे प्राबल्य असल्याने व या मतदारसंघातील सर्व राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केल्यानेच ही विजयश्री खेचून आणण्यात यश मिळाले.” आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पुन्हा एकदा जोमाने निवडणूक रिंगणात उतरणार असून महाराष्ट्रात जास्तीत-जास्त उमेदवार आघाडीचे निवडून आणण्यासाठी आघाडी धर्म पाळून एकदिलाने प्रयत्न करणार आह, असेही त्यांनी सांगितले.