मुंबई – कसोटी संघात स्थान मिळवण्यात मला अपश येत होते ते माझ्या सुमार कामगिरीमुळे नव्हे, तर तत्कालीन निवड समितीच्या दुर्लक्षामुळे, अशा शब्दांत सिक्सरकिंग युवराजसिंगने आगपाखड केली आहे.
एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये प्रचंड यशस्वी ठरलेला युवराज कसोटी क्रिकेटमध्ये मात्र फारसा यशस्वी ठरलेला नाही. मात्र, तरीही त्याच्या नावावर 40 कसोटी सामने जमा आहेत. तत्कालीन निवड समितीने माझ्याबाबत अनेक ग्रह करून घेतले होते. त्यांना मी केवळ मर्यादित षटकांच्याच क्रिकेट संघात योग्य असल्याचे वाटत होते. त्यामुळे कसोटी क्रिकेटसाठी त्यांनी माझ्या नावाचा फारसा विचारच केला नाही.
सात वर्षे मी कसोटी संघात राखीव म्हणून निवडला जात होतो. आता पुढील जन्मी जर मी क्रिकेटपटूच बनलो तर मात्र, मला पुन्हा राखीव खेळाडू म्हणून राहायचे नाही, असेही युवराज म्हणाला.
युवराजने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये एकदिवसीय व टी-20 क्रिकेटमध्ये प्रचंड यश मिळवले. मात्र, कसोटीत त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. त्यामुळेच तत्कालीन निवड समितीला तो कसोटी फलंदाज वाटतच नव्हता. त्याचमुळे युवराजला कसोटी क्रिकेटमध्ये खेळण्याच्या संधीही फारशा मिळाल्या नाहीत. यावरही युवराजने खंत व्यक्त केली.