पिंपरी (तुषार रंधवे) – शहरातील तरूणाईला भाई बनण्याचे आकर्षण त्यांच्या जीवनातील अनेक अडचणी वाढवत आहे. गुन्हेगारी जगतातील प्रवेश या तरुणांच्या जीवनातील महत्वाच्या घडामोडींवर परिणामकारक ठरत असल्याचे समोर आले आहे. आजच्या या इंटरनेटच्या युगात कोणतीच बाब संपत नसते. गुन्हा केल्यानंतर कित्येक वर्षांनी देखील ते कृत्य इंटरनेटवर जिवंत राहते. याचा अनुभव सध्या अनेकांना येत आहे. लग्न जुळविताना मुलाची प्रोफाइल चेक करण्यासाठी मुलीकडील मंडळी गूगलवर सर्च करतात. मुलाचे नाव पडताच जर त्याचे नाव कधी कोणत्या गुन्ह्यात आले असेल तर त्या बातम्या सर्वांत आधी समोर येतात.
लग्न जमविताना मुलीकडच्या मंडळींकडून ऑनलाइन पद्धतीने केल्या जाणाऱ्या पडताळणीमुळे अथवा गुन्ह्यात सहभागाचे वृत्तपत्रातील कात्रणामुळे अनेक तरूणांची लग्न रद्द होण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. यामुळे अनेकांची लग्न ठरत नसल्याचे दिसून येत आहे. यातील काही तरुण थेट प्रसारमाध्यमांना संपर्क करुन इंटरनेटवरुन ती बातमी काढण्याची विनंती देखील करत आहेत.
अनेक तरूणांना कमी वयातच गुन्हेगारी जगताचे आकर्षण असते. चित्रपट, वेबसीरीज आणि सोशल मीडियावरील रील्सने गुन्हेगारीला आकर्षक बनविण्याचे काम केले आहे. यामुळे अनेक तरुण टोळक्यामध्ये नको ते धाडस करतात आणि त्यांचे एक कृत्य त्यांच्या आयुष्याभरासाठी त्रासदायक ठरते. विशेषत: दोन गटात झालेल्या हाणामारीत गाड्या फोडणे, पैसे अथवा ऐवज हिसकावणे अशा प्रकारची कृत्ये करताना आपल्या कोणती कलमे लागतील याचा ते विचार करत नाहीत. लूटमार, खंडणी असे गुन्हे दाखल होतात. एकदा का आरोपीच्या यादीत नाव आले आणि प्रसिद्धी माध्यमांनी प्रसिद्ध केले की इंटरनेटच्या युगात कायमस्वरुपी हा कलंक टिकून राहतो.
भूतकाळ बिघडवितो भविष्यकाळ
गुन्हेगारीतील प्रवेशानंतर आलेल्या विदारक अनुभवामुळे अनेक तरुण स्वत:मध्ये सुधारणा करुन घेतात. नोकरी धद्यांसाठी प्रयत्न करतात. अनेक कंपन्यांमध्ये चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्राची मागणी केली जाते. अशा ठिकाणी मात्र रोजगाराची संधी असतानादेखील गुन्ह्यातील सहभागामुळे करिअर उद्धवस्त होते. एवढे होऊनही काहीजण आपल्या आयुष्याला आकार देतात. परंतु नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी आवश्यक असलेला जोडीदार मिळवितानाही त्रास होतो. एखादे स्थळ बघून आल्यानंतर मुलीकडच्या मंडळींकडून ऑनलाइन पद्धतीने मुलाविषयी माहिती काढली जाते. एखाद्या गुन्ह्यातील सहभागाची बातमी प्रसिद्ध झाली असल्यास त्या बातमीची लिंक किंवा थेट बातमीचे कात्रणच मुलीकडच्या मंडळींना मिळत आह. हा भूतकाळ पिच्छा सोडत नसल्याने भविष्यकाळ बिघडू नये असे वाटत असल्यास सुरुवातीपासूनच गुन्हेगारीपासून दूर राहणे, हाच एकमेव उपाय आहे.
अनेक रिक्षा परमिटही रखडली
मुक्त रिक्षा वाटप धोरणामुळे तरुणांना हक्काचा रोजार उपलब्ध झाला आहे. बॅच, बिल्ला असलेल्या तरुणाला प्रवासी वाहतुकीकरिता तीन आसनी रिक्षा उपलब्ध होऊ शकते. मात्र, त्याकरिता चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असल्याने शहरातील अनेक जणांना इच्छा व पैसे असूनही स्वत:च्या नावावर रिक्षा परमीट घेता येत नसल्याचे वास्तव आहे.
अजाणत्या वयात तरुणांकडून घडलेले एखादे गुन्हेगारी कृत्य त्यांच्या जीवनातील अनेक महत्वाचे मार्ग बंद करून टाकत असते. जीवनातील मोलाच्या संधी हातून जाऊ नयेत, याकरिता तरुणांनी सार्वजनिक जीवनात वावरताना खबरदारी घेतली पाहिजे. तसेच घरच्या मंडळीनी देखील आपल्या मुलाचे कोणत्या मित्रांबरोबर उठणे बसणे आहे, यावर लक्ष ठेवले पाहिजे.
– राजेंद्र निकाळजे, पोलीस निरिक्षक, एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन