नगर -होय, सरकारने लॉकडाऊनमध्ये घालून दिलेल्या अटी व शर्तींचे पालन करुन पन्नास माणसांमध्येच विवाह सोहळा करु… पण करायचा कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नावर जिल्हा प्रशासनही गोंधळलेल्या स्थितीत दिसते. लग्नसोहळ्यासाठी वधू-वरांचे कार्यवाह सध्या लॉकडाऊनच्या अटी शिथिल झाल्याने घराबाहेर पडत आहेत. तथापि, कोणतेही मंगल कार्यालय अथवा सांस्कृतिक हॉल त्यांची बुकींग घेत नाही. त्यातून मोठीच पंचाईत झाली आहे.
“लग्न पाहावे करून…’ असे म्हटले जाते ते काही उगाच नाही. त्यात यावर्षी लग्नसोहळ्यांना करोनाची नजर लागली. अर्थात अनेक वधू पित्यांच्या दृष्टीने ही पन्नास माणसांची अट अत्यंत कमी खर्चाची व फायद्याचीच. मात्र, लॉकडाऊन व करोना प्रसार रोखण्यासाठी तयार झालेल्या नियमावलीत लग्नसोहळा बसविताना खास करुन वधू पित्यांची दमछाक होत आहे. पन्नास लोकांच्या उपस्थितीची परवानगी सरकारने दिली. मात्र, अजून सभागृह, मंगल कार्यालये किंवा लॉन्सला कधीपासून बुकिंग घेता येईल, यासंदर्भातील आदेश नाहीत किंवा अधिकृत नियमावली लॉन्स किंवा मंगल कार्यालयांना दिलेली नाही. त्यामुळे कारवाईच्या भीतीपोटी ते बुकिंग घ्यायला तयार नाहीत. ग्रामीण भागात जागेची अडचण थोडी कमीच. पण तिथे स्वच्छतागृह किंवा विजेच्या समस्या आहेत. नगरसारख्या शहरात चाळीत राहणाऱ्या कुटुंबांनी कुठे विवाह सोहळे करावेत, असे प्रश्न आहेत. गल्लीत लग्नसोहळा करण्याचा प्रयत्न केल्यास तिथे फिजिकल डिस्टन्स कसे पाळायचे? असा पेच आहे.
अनेक कुटुंब तीन किंवा चार खोल्यांच्या प्लॅटमध्ये राहतात. इतक्या कमी जागेत फिजिकल डिस्टन्स कसे पाळायचे? असा त्यांच्यापुढे प्रश्न आहे. त्यामुळे अनेक ठरलेले विवाह सोहळे अडकून पडलेत. दरम्यान, फिजिकल डिस्टन्ससह अन्य अटी, शर्तीवर हॉटेल किंवा सभागृहात लग्नाची परवानगी मिळावी, यासाठी स्थनिक मंगल कार्यालये, हॉटेल, सांस्कृतिक हॉल चालकांनी जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली होती. मात्र, करोना महामारीच्या संकटात ही समस्याच अडगळीत पडली. दुसरीकडे वधू-वर पिता याच मंगल कार्यालये, लॉन्सकडे खेट्या घालत आहेत.
परंतु लॉकडाऊनमध्ये कोणतेही निर्देश नसल्याने त्यांचाही नाईलाज आहे. सरकारच्या या विरोधाभासी निर्णयावर वधू-वर पिता व नातेवाईकांकडून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. त्यातही राहत्या परिसरात लग्नसोहळे करण्याचे नियोजन केल्यास या 50 वऱ्हाड्यांना देखील उभे राहायला जागा पुरणार नाही. 50 पाहुण्यांसाठी स्वच्छतागृहाची सोय होणार नाही. विश्रांतीच्या व्यवस्थेची अडचण होईल. शिवाय अनेक घरांना अंगणही नाही. त्यामुळे वधू पिता जास्त त्रस्त आहेत.
माझ्या प्रभागातील एक वधू पिता पन्नासपेक्षाही कमी माणसांच्या उपस्थितीत मुलीचे लग्न सोहळा करू इच्छितात. त्यात त्यांचा खर्चही वाचेल, अशी त्यांची भावना आहे. ते अनेक मंगल कार्यालये, सांस्कृतिक हॉल चालकांना भेटले. फिजिकल डिस्टन्स, मास्क आदी सर्व तयारीनिशी लग्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली. तथापि, एकही मंगल कार्यालय किंवा सांस्कृतिक हॉल त्यांची बुकिंग घेत नाही. त्यांचे घर चाळीत आहे. अगोदरच तिथे त्यांच्या परिवारापुरती जागा. त्यात घरासमोर अंगणच नाही. त्यांनी काय करावे? प्रशासनाने मंगल कार्यालयांना खास गाईडलाईन देऊन परवानगी द्यायला हवी.
गणेश भोसले नगरसेवक