मुंबई – सध्या राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही भागात अद्यापही प्रतिक्षा कायम आहे. या पावसाने काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांची उभी पिके वाया जाण्याच्या मार्गावर होती. मात्र, मागील तीन चार दिवसापासून सुरु झालेल्या पावसाने पिकांना जीवदान दिले आहे.
दरम्यान, हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार उद्याही राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच, कोकणासह मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर पावसाचा “येलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
हवामान विभागानुसार, कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
दरम्यान, राज्यातील मुंबईसह ठाणे, पालघर परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्याचबरोबर वाशिम, नंदुरबार, पुणे, नाशिक जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली आहे.