पारनेर – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून उपोषणकर्ते बबलू रोहोकले यांच्याशी संवाद साधल्यानंतर मराठा आरक्षणासाठी भाळवणीकरांनी चार दिवासांपासून सुरू केलेले उपोषण मागे घेण्यात आले. उपोषण मागे घेण्यासाठी आ. नीलेश लंके यांनी केलेली शिष्टाई सफल झाली.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनास पाठिंबा तसेच जालना येथील आंदोलकांवर करण्यात आलेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ अशोक उर्फ बबूल रोहोकले, अभिजित रोहोकले व सुधीर रोहोकले यांनी चार दिवसांपूर्वी भाळवणी येथे उपोषण सुरू केले होते. या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी नगर-कल्याण महामार्गावर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलनही केले होते. उपोषणादरम्यान विविध गावांच्या ग्रामस्थांनी या उपोषणास पाठिंबा जाहिर केला होता.
उपोषणादरम्यान तहसिलदार गायत्री सैंदाणे यांनी शुक्रवारी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र, मनोज जरांगे हे 11 दिवसांपासून आंदोलन करीत असताना आम्ही तीन दिवस उपोषण केले तर बिघडले कुठे, अशी भूमिका घेत उपोषणकर्ते आंदोलनावर ठाम राहिले.
शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आ. नीलेश लंके, ऍड. राहुल झावरे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. आ. नीलेश लंके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधून या आंदोलनाची माहिती दिली. त्यानंतर पवार यांनी बबलू रोहोकले यांच्याशी संवाद साधून रोहोकले यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
आ. लंके यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चेनंतर उपोषणकर्त्यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर आ. नीलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठविले आहे. उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले असले तरी त्यांच्या मागण्यांचा लवकरात लवकर विचार करून त्या मार्गी लावण्याची मागणी या पत्रात करण्यात आली आहे.