यवत(प्रतिनिधी) : नाथाचीवाडी (ता.दौंड) येथील पिंपळगाव-खुटबाव रस्त्यावर इरिगेशन ऑफिस नजीक कार चालकाचा कार वरील ताबा सुटून झालेल्या अपघातात कारमधील चौघापैकी एकाचा मृत्यू झाला आहे तर तिघेजण गंभीर जखमी आहेत. ही घटना बुधवार (दि.06) रोजी रात्री 1:10 वाजण्याच्या सुमारास घडली.
यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार (दि.05) रोजी साय. 7.00 च्या सुमारास मारुती सुझुकी कपंनीची स्विफ्ट क्र.(एम.एच 12 एन.बी 2699) मध्ये बाबासाहेब गौतम साठे, रोहित देविदास शिंदे, गोरख अडागळे, दत्ता सुदाम मस्तुद आणि प्रदीप बाळासाहेब करचे असे हे सर्वजण मिळून ट्रकचे साहित्य आणण्यासाठी केडगाव – चौफुला याठिकाणी गेले होते. मंगळवारी (दि.06) रात्री 1.10 च्या सुमारास प्रदीप करचे यांना घरी सोडून हे खुटबाव – पिंपळगाव रस्त्याने निघाले असता काही अंतरावरच स्विफ्ट चालक दत्ता मस्तुद याचा कार वरील ताबा सुटून कार समोरील बंगल्याच्या संरक्षक भिंतीवर जोरदार आदळून अपघात झाला.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने या अपघातातील जखमीना वरदविनायक हॉस्पिटल, केडगाव(ता.दौंड) येथे दाखल करण्यात आले होते. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी यवत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर बाबासाहेब साठे. (वय-36 वर्ष,रा.पिंपळगाव,ता.दौंड) यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरानी सांगितले. दोघेजण वरदविनायक हॉस्पिटल व एकजण विश्वराज हॉस्पिटल लोणीकाळभोर येथे दाखल असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे बोलले जात आहे.
वाहनचालकाने स्वतःच्या ताब्यातील वाहन अविचाराने व हयगईने चालविणे, रहदारीचे नियमांकडे दुर्लक्ष करणे आणि बाबासाहेब साठे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून पोलिसांनी वाहन चालक दत्ता सुदाम मस्तुद (रा.नाथाचीवाडी,ता.दौंड) यांचे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार रमेश कदम, पोलीस नाईक अजित इंगवले आणि पोलिस मित्र रमेश चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास करत आहेत.