Nana Patole Car Accident | Ashok Chavan – ग्राऊंड रियालिटी माहित नसलेल्या नेतृत्वामुळे काँग्रेसला महाविकास आघाडीत अवघ्या 17 जागांवर समाधान मानावे लागले. यापूर्वी काँग्रेसची एवढी वाईट अवस्था कधीच नव्हती, अशी घणाघाती टिका भाजपा नेते व खासदार अशोक चव्हाण यांनी बोलताना केली.
मोदींच्या सभेला उपस्थित राहाण्यासाठी आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. काँग्रेसचे नेते उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्यासमोर आपली भूमिका प्रभावीपणे मांडू शकत नाहीत.
त्यामुळे त्यांच्यावर जागा गमावण्याची वेळ आली. सगळ्याच जागा निवडून येऊ शकत नाहीत. मात्र भिवंडी व सांगली या काँग्रेसच्या पारंपरिक जागा सोडून दिल्या याचे आश्चर्य वाटते, असे चव्हाण म्हणाले.
समन्वय कोण साधते मला माहित नाही. पण त्यांचे जे काही चालले आहे, त्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. जागांचा विचार करतो तेव्हा आपला प्रभाव पडला पाहिजे. मतदारसंघांचा अभ्यास असला पाहिजे, असा टोलाही अशोक चव्हाण यांनी जागावाटपाची चर्चा करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना हाणला.
मोदींना मानणारा मोठा वर्ग आहे. पार्टीच्या बाहेर सुद्धा त्यांना मानणारे लोक आहेत. त्यांच्याकडे आकर्षीत होणारे मतदार आहेत. महायुतीला पोषक वातावरण आहे. पण त्यांच्या सभेनंतर आणखी चांगले वातावरण निर्माण होईल, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या सभांना मोठी उपस्थिती असते. त्यांची रोखठोक शैली आहे, त्यांचा चाहता वर्ग आहे. ते महायुतीला देत असलेल्या समर्थनाचा फायदा नक्कीच होईल, असेही अशोक चव्हाण यावेळी बोलताना म्हणाले.
घातपाताची टिका हास्यास्पद
अपघात होणे मी समजू शकतो. अपघात रोज होत असतात. ते होऊ नये म्हणून सगळ्यांचा प्रयत्न असतो. अपघात होणे गंभीर बाब आहे. मात्र घातपातामुळे अपघात झाला किंवा करण्यात आला हा निष्कर्ष पटोले यांनी कुठल्या आधारावर काढला हा प्रश्न आहे.
ते भाजपावर करीत असलेले आरोप हास्यास्पद आहेत. घातपात म्हणायचे असेल तर त्याचा काही पुरावा आहे का असा प्रश्न आहे, असे चव्हाण म्हणाले.