नवी दिल्ली :– महिला कुस्तीपटू विनेश फोगाटनेही आता तिचा खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत केला आहे. सोशल मीडियावर तिनं ही माहिती दिली आहे. मी माझा मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत करत आहे. मला या परिस्थितीत आणल्याबद्दल शक्तिशाली लोकांचे खूप खूप आभार, असे तिने आपल्या पोस्टमध्ये लिहले आहे.
यासोबतच तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्राचा फोटोही शेअर केला आहे. विनेशच्या आधी बजरंग पुनियानेही असाच पद्मश्री पुरस्कार परत केला होता. त्याचबरोबर साक्षी मलिकनेही कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे. भारतीय कुस्ती संघटनेची निवडणूक २१ डिसेंबर रोजी पार पडली. यामध्ये संजय सिंह यांची अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर कुस्तीपटूंनी पुन्हा अंदोलनाचा पावित्रा घेत या निवडीला तिव्र विरोध दर्शविला होता.
“आम्हा महिला खेळाडूंना केवळ सरकारी जाहिरातींवर दिसण्यासाठी तयार केले जाते का? मी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे स्वप्न पाहिले होते, पण आता हे स्वप्नही धुळीस मिळत आहे. जेव्हा आम्ही देशासाठी पदके जिंकली, तेव्हा संपूर्ण देशाला आमचा अभिमान वाटायचा. आता आम्ही न्यायासाठी आवाज उठवल्यावर आम्हाला देशद्रोही म्हटले जात आहे. त्यामुळे खरंच आम्ही देशद्रोही आहोत का?
– विनेश फोगाट, (पंतप्रधान मोदींना लिहलेल्या पत्रात)
विनेशने पंतप्रधानांना लिहलेल्या पत्रात म्हटले की, २०१६, जेव्हा साक्षी मलिकने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले होते, तेव्हा तुमच्या सरकारने तिला “बेटी बचाओ बेटी पढाओ” ची ब्रँड अॅम्बेसेडर केली होती. जेव्हा ही घोषणा झाली तेव्हा देशातील सर्व महिला खेळाडू आनंदात होत्या आणि एकमेकांना अभिनंदनाचे संदेश पाठवत होत्या. मात्र आजची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, असेही विनेशने आपल्या पत्रात म्हटले आहे.