पुणे -आजच्या तरुण पिढीला बेजबाबदार म्हटले जाते, पण यांच्यापेक्षा जबाबदार आणि सजग मला कोणीही वाटत नाही. तरुणाईकडे बघूनच मी जिवंत आहे, असे मत अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केले.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन लागू करायचा की नाही, यावर मतमतांतरे असताना अभिनेते नाना पाटेकर यांनी आपले मत व्यक्त केले आहे. कोणत्याही सरकारला लॉकडाऊनचा निर्णय घेताना आनंद वाटत असेल का? मी कोणत्याही पक्षाचा नाही. पण जर आपल्याला मृत्यू टाळायचे असतील, तर हे गरजेचं आहे, असे नाना पाटेकर यांनी म्हटले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग, नाम फाउंडेशन, शिवम प्रतिष्ठान, निर्मला गजानन फाउंडेशन आणि प्रादेशिक रक्तपेढी ससून रुग्णालय यांच्या वतीने रक्तदान महाअभियान शिबिराचे आयोजन केले आहे. याची सुरुवात सोमवारी विद्यापीठातील क्रीडा संकुल येथे नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत झाली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस.उमराणी, अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, डॉ. मनोहर चासकर, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, संजय चाकणे, प्रसेनजीत फडणवीस, विलास उगले, अधिसभा सदस्य बागेश्री मंठाळकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई आदी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. करमळकर यांनी करोनाकाळात रक्ताचा तुटवडा असताना सामाजिक जाणिवेतून विद्यापीठ आपला खारीचा वाटा देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे नमूद केले.
यावेळी रक्तदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. सोमवारी दुपारी दोन वाजेपर्यंत सव्वाशे विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.